Manoj Jarange Patil Azad Maidan Morcha: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं दक्षिण मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. आज (2 सप्टेंबर) मनोज जरांगेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे लाखो मराठा आंदोलकांसह मुंबईत दाखल झाले होते. मनोज जरांगे यांनी कालपासून पाणी पिणंही बंद केल्याने त्यांची प्रकृती खालावल्याचे दिसून येतंय. तर दुसरीकडे राज्य सरकारच्या देखील हालचाली वाढल्या आहेत.

मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सरकार लवकरच नवा जीआर काढण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय. कुणबी प्रमाणपत्राच्या सुलभतेसाठीही हालचाली सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. महाधिवक्त्यांच्या मान्यतेनंतर जरांगेंना मसुदा दाखवून याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती समोर येत आहे. मराठा आंदोलनावर तोडगा काढण्याचा सर्वात मोठा पेच सध्या राज्य सरकारसमोर आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या जरांगेंच्या मागणीमुळे पेच निर्माण झालाय. यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, महाधिवक्ता विरेंद्र सराफ यांच्यात बैठक पार पडली.

राज्य सरकारकडून नेमकं काय केलं जाणार?

1. मराठा आरक्षणासाठी नवीन जीआर: राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी नवीन शासन निर्णय (जीआर) काढण्याच्या तयारीत? 

2. कुणबी प्रमाणपत्रासाठी सुलभता: कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गावातील नातेवाईक किंवा कुणबी प्रमाणपत्रधारक यांच्या ॲफिडेव्हिटवर आरक्षण लागू करण्यासंदर्भात विचार

3. गाव पातळीवर स्क्रुटिनी कमिटी: कुणबी नोंदी पडताळणीसाठी तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर नवीन स्क्रुटिनी कमिटी स्थापन करून गाव पातळीवर नोंदी शोधण्याचा निर्णय

4. ⁠महाधिवक्त्यांच्या मान्यतेनंतर जरांगे पाटील यांना मसुदा दाखवून अंतिम निर्णय घेतला जाईल.

हायकोर्टाने कोणते निर्देश दिले?

आज मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. मात्र मराठा आंदोलन हाताबाहेर गेलंय. त्यामुळे मुंबई आज (2 सप्टेंबर) दुपारपर्यंत रिकामी करा असे महत्वपूर्ण आदेश हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत. ऐन गणेशोत्सवात मराठा आंदोलनामुळे मुंबईला छावणीचं स्वरुप आलंय. त्यामुळे आंदोलकांना दक्षिण मुंबईत सोडू नका असे निर्देश कोर्टानं दिलेत. तसंच आझाद मैदान सोडून सीएसएमटी,मरीन ड्राईव्ह, हुतात्मा चौक आणि दक्षिण मुंबईतील इतर भागातून आंदोलकांना बाहेर काढण्याचे निर्देश कोर्टानं दिलेत. आझाद मैदानात जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र न्यायालयाने आता प्रशासनाला अनेक निर्देश दिले आहेत. आंदोलनाबाबत हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद करण्यात आला. आंदोलकांनी सर्व नियम पायदळी तुडवल्याचं स्पष्टीकरण राज्य सरकारच्या वतीनं महाधिवक्त्यांनी कोर्टात दिलं. तर त्याचवेळी सरकारनं योग्य अंमलबजावणी न केल्यानं आंदोलकांचे प्रचंड हाल झालेत, असा युक्तिवाद जरांगेंच्या वकिलांनी केलाय. दरम्यान आज दुपारी 1 वाजता पुन्हा सुनावणी होणार असून कोर्टानं राज्य सरकारला दिलेल्या आदेशांचं पालन होतंय की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातमी:

Manoj Jarange Patil Azad Maidan Morcha: आझाद मैदानात भलामोठा मंडप, गाड्या पोलिसांनी काढल्या; कोर्टाच्या निर्देशानंतर काय काय घडलं?