मुंबई : महाराष्ट्रातील लोकांनी असा निर्णय दिला आहे, की ज्या निर्णयामुळं माजी राज्यपाल सुशीलकुमार शिंदे आणि वर्तमानातील राज्यपाल म्हणजे मी, आम्ही दोघेही परेशान आहोत. आज मला जरा गडबड आहे, त्यामुळे मी तुमचा लवकर निरोप घेतो , असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे. 'ये है मुंबई मेरी जान' या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.


कुलवंतसिह कोहली यांच्या अनुभवावर आधारित 'ये है मुंबई मेरी जान' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा हॉटेल 'ताज' येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि माजी राज्यपाल सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यार म्हणाले, सरदार कुलवंतसिंह कोहली यांनी अनेकांना आपल्या आयुष्यात उभं केलं आहे. हॉटेल, चित्रपट आणि उदयोग जगतापासून सामाजिक क्षेत्रापर्यंतच्या आठवणी आणि अनुभवांनी हे पुस्तक भरलेले आहे. त्यांच्या आठवणी, त्यांचे अनुभव या पुस्तकात आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन माझ्या हस्ते करण्यात आले, याचा मला आनंद आहे. मात्र मी आज थोडा गडबडीत आहे. कारण महाराष्ट्रातील लोकांनी असा निर्णय दिला आहे की ज्या निर्णयामुळं माजी राज्यपाल सुशीलकुमार शिंदे आणि वर्तमानातील राज्यपाल म्हणजे मी, आम्ही दोघेही परेशान आहोत. त्यामुळे मला या कार्यक्रमातून लवकर जावं लागतंय, असं म्हणताचं कार्यक्रमात हशा पिकला.

विधानसभेचा निकाल लागून आज 13 दिवस उलटले आहे. शिवसेना-भाजपला पूर्ण बहुमत मिळालं आहे. भाजप 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेनेने 56 जागा जिंकल्या आहे. मात्र सत्तास्थापनेवरुन दोन्ही पक्षांमधील संघर्षामुळे मुख्यमंत्री कोण होणार हे अजूनही स्पष्ट होऊ शकत नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळी विधानसभेसाठी जो फॉर्म्युला ठरला होता, त्यानुसार अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची मागणी शिवसेना करत आहे. मात्र शिवसेनेची ही मागणी भाजपला मान्य नाही. भाजप-शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने राष्ट्रपती राजवट राज्यात लागू करण्याची स्थिती निर्माण झाली तर काय करावं लागेल, या शक्यताही भाजपकडून तपासल्या जात आहे. राज्यात सरकार स्थापन झालं नाही, तर पुढील पर्यात काय असतील हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.