Raj Thackeray-Uddhav Thackeray: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 20 वर्षापासून ज्या प्रसंगाची आतुरता होती, जो प्रसंग घडवण्यासाठी मराठी मनामध्ये सातत्याने कुठेतरी चर्चा होत होती. दोन बंधूंमधील मतभेद दूर करून त्यांनी एकत्रित लढलं पाहिजे असेही बोलले जात होते, तो प्रसंग आज अवघ्या महाराष्ट्राने पाहिला आणि क्षणभर स्तब्ध झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मराठी विजय मेळाव्यामध्ये एकमेकांची गळा भेट घेतली आणि अवघा महाराष्ट्र काही क्षणासाठी स्तब्ध झाला. दोघांची विचारधारा प्रबोधनकार ठाकरेंपासून असल्याने या भेटीमध्ये अवघ्या महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लक्ष लागून राहिलं होतं. दोघांनीही मराठीवरून महाराष्ट्राला आवाहन करताना मराठी म्हणून एकत्र राहण्याचे आवाहन केलं.
या 20 वर्षानंतरच्या भेटीमध्ये उद्धव ठाकरे यांनी अधिक समर्पकमध्ये बोलताना भाजप आणि भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाचा बुरखा फाडण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे यांनी मराठी भाषा, संस्कृतीवर विवेचन करताना भाजपकडून होणाऱ्या आरोपाला सुद्धा प्रत्युत्तर देत एक प्रकारे देशभरातील नेत्यांची शाळा कोणत्याही भाषेतून झाली असली, तरी त्यांचा मातृभाषेसाठी असलेला कडवटपणा सुद्धा दाखवून दिला.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड सुद्धा उपस्थित होते. आव्हाड यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाड यांनी ट्विट करत म्हटलं आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्र येणं पाहून या मातीतील तमाम मराठी माणूस सुखावला असणार आहे. माय मराठीच्या सन्मानार्थ उभा राहत असलेल्या लढ्यात आपण सगळेच मराठीत लेकरं म्हणून रिंगणात उतरु, असं त्यांनी व्हिडिओ ट्विट करत म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या