Team India : टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मायदेशात परतलेल्या टीम इंडियाचे मुंबईमध्ये न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने स्वागत करण्यात आले. लाखोंचा जनसमुदाय स्वागतासाठी मुंबईमध्ये उतरला होता. त्यामुळे टीम इंडियाच्या स्वागताने संपूर्ण देश आनंदात न्हाऊन निघाला. विजयी संघात असलेल्या महाराष्ट्रातील चार शिलेदारांचा विशेष सत्कार आणि अभिनंदन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.  

Continues below advertisement


T20 वर्ल्ड कप विजेत्या टीममध्ये मुंबईकर रोहित शर्मा, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव या चार खेळाडूंचा समावेश होता. महाराष्ट्र कॅप्टन रोहितसह चार खेळाडू टी ट्वेंटी वर्ल्ड कप विजेत्या टीममध्ये असल्याने एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. त्यांचा विधानभवनामध्ये सत्कार सुद्धा करण्यात येणार आहे. मात्र, यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. 






अभिनंदनचा प्रस्ताव शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडला होता. त्यांनी लावलेल्या बॅनरवरून वडेट्टीवार यांनी खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचाच फोटो असल्याने वडेट्टीवार यांनी टीका केली आहे.  


बॅनरमध्ये एक तरी खेळाडू दिसतोय का?


ट्विट करत त्यांनी म्हटलं आहे की, या तिघांचं काय योगदान? विश्वविजेते खेळाडू राहिले बाजूला, पक्षफोडेच पुढे पुढे! विश्वचषक जिंकलेल्या भारतीय क्रिकेट संघात असलेल्या मुंबईतील खेळाडूंचा विधान भवनात आज सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सत्कार सोहळ्यानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनर मध्ये एक तरी खेळाडू दिसतोय का? घेणं न देणं फक्त क्रेडिट घेण्याची घाई!


दरम्यान, आज शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता विधानभवन येथे सेंट्रल हॉल येथे रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या चार खेळाडूंचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या चारही खेळाडूंना राज्य शासनाकडून प्रत्येकी 1 कोटी रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या