मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई (Mumbai) शहर आणि उपनगर जिल्ह्यामध्ये विविध यंत्रणांनी केलेल्या पूर्वतयारींचा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत आज आढावा घेतला. तसेच निवडणुकीच्या (Election) कामकाजात कोणतीही कसूर राहू नये, यासाठी योग्य ती काळजी घेऊन सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने, सहकार्याने कार्य करावे. कोणत्याही लहानात लहान अडचणीलाही गांभीर्याने घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देशही गगराणी यांनी या बैठकीत संबंधित यंत्रणांना दिले. गगराणी यांनी घेतलेल्या बैठकीमुळे आता लवकरच विधानसभा (Vidhansabha) निवडणुकांचा बिगुल वाजणार असल्याचं सप्ष्ट झालं आहे. कारण, प्रशासकीय यंत्रणा आता निवडणुकांच्या कामाला लागल्या आहेत. या बैठकीला अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्यासह अनेक संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. 


आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध मतदारसंघांमधील मतदान केंद्रांची स्थिती, आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती, मतदार याद्यांची स्थिती आणि नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करणे, मतदान संयंत्र ठेवण्यासाठी स्ट्राँग रुम, संवेदनशील मतदान केंद्रांची यादी, पोलिस आणि निवडणूक यंत्रणा यांच्याकडून विविध मतदारसंघांमध्ये संयुक्त पाहणी आदींबाबत अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी (उपनगरे) राजेंद्र क्षीरसागर आणि विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार यांनी आढावा सादर केला. संपूर्ण स्थिती जाणून घेत प्रक्रियेचा आढावा घेतल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी म्हणाले की, विधानसभा निवडणुकीशी संबंधीत मुंबईतील सर्वच यंत्रणांकडून उत्तम पद्धतीने काम सुरू आहे. मतदानाची टक्केवारी वाढवणे अत्यंत महत्वाचे असल्याने प्रत्येक नागरिकांपर्यंत आपली यंत्रणा पोहोचेल, हे सुनिश्चित करावे. मतदार यादीमध्ये मतदारांची नाव नोंदणी करणे इत्यादी प्रक्रियाही लवकरात लवकर पूर्ण करावी. नागरिकांना त्यांच्या निवासाच्या ठिकाणापासून अगदी जवळ मतदान केंद्र उपलब्ध करुन देण्यासाठी सुलभ रचनेवर भर देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने देखील गृहनिर्माण संस्थांशी पुन्हा एकदा भेटी देऊन समन्वय साधावा. संपूर्ण कामकाजादरम्यान कोणत्याही प्रकारची लहानात लहान अडचण असेल तरी ती आपल्याकडे न ठेवता त्यावर वेळीच आणि योग्य पद्धतीने तोडगा निघावा, यासाठी वरिष्ठांशी वेळोवेळी चर्चा करावी. निवडणुकीसंदर्भातील संपूर्ण तयारी अत्यंत चोखपणे आणि जबाबदारीने पार पाडावी, असे निर्देशही गगराणी यांनी यावेळी दिले आहेत. 


दरम्यान, मुंबईसह राज्यातील सर्वच जिल्ह्यात जिल्हाधिकारी व प्रशासकीय यंत्रणा निवडणूक कामात सक्रीय झाल्या असून पुढील काही दिवसांतच निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होऊ शकते. पुढील ऑक्टोबर महिन्यात निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.  


हेही वाचा


नागपूर हिट अँड रन, पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासले, पण...; भुवया उंचावणारे दृश्य