शेतकऱ्यांच्या समस्य़ांवरुन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंकडून सरकारची कानउघाडणी
एबीपी माझा वेब टीम | 11 Nov 2017 02:04 PM (IST)
"जनतेसाठी शेतकरी अन्नधान्य पिकवतात, त्यामुळे त्यांची काळजी घेणं ही सरकारचीच जबाबदारी आहे," असं म्हणत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सरकारचे कान टोचले.
नागपूर : "जनतेसाठी शेतकरी अन्नधान्य पिकवतात, त्यामुळे त्यांची काळजी घेणं ही सरकारचीच जबाबदारी आहे," असं म्हणत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सरकारचे कान टोचले. नागपूरमध्ये अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. नागपुरात दरवर्षी अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचे आयोजन केलं जातं. यंदाचं हे नववं वर्ष असून, शुक्रवारपासून सुरु झालेले हे प्रदर्शन सोमवारपर्यंत चालणार आहे. यात शेती बरोबरच शेतीतील नविन तंत्रज्ञानाची माहीती देण्यात आली. नायडू म्हणाले की, "आता शेतकरी स्वतः ला संघटीत करत असून, ते त्यांच्या रास्त मागण्यासाठी आंदोलने ही करत आहेत. मात्र हे आंदोलन अहिंसक असायला हवे," असे ही व्यंकय्या नायडू म्हणाले. "संसदेमध्ये शेतीवर चर्चा झाल्यास माध्यमं कधीच त्याकडे लक्ष देत नाहीत. मात्र, संसदेत कोणी धुडगूस घातला, तर माध्यमांमधून त्याची चर्चा होते. माध्यमांनी शेती आणि ग्रामीण विषयांना प्राधान्य द्यायला हवं," असे ते म्हणाले. याच कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 25 नोव्हेंबरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे लाभ पोहोचतील, अशी ग्वाही दिली. आम्ही राज्याच्या इतिहासात आजवरची सर्वात मोठी आणि पारदर्शक कर्जमाफी केल्याचा दावा त्यांनी केला. विशेष म्हणजे, विद्यमान सरकारने केलेल्या पारदर्शक कर्जमाफीमुळे फक्त योग्य आणि गरजू शेतकरीच पात्र यादीत असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.