उस्मानाबाद : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात सलग दुसर्‍या वर्षी उस्मानाबादचा झेंडा कायम राहिला आहे. दोन एकर शेतीवर चरितार्थ चालवणार्‍या दिलीप बदोले यांचा मुलगा गिरीश बदोले याने यूपीएससी परीक्षेत देशात 20 वा तर राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.


गेल्या वर्षी उस्मानाबाद जिल्ह्यातील विश्वांजली गायकवाड हिने देशात अकरावे स्थान पटकावत राज्यात अव्वल येण्याचा बहुमान मिळवला होता.

उमरगा तालुक्यातील कसगी या छोट्याशा गावातून गिरीश बदोले याने संपादित केलेलं घवघवीत यश ग्रामीण भागातील अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. इयत्ता पहिली आणि दुसरी दोन वर्ष गावातच त्याने शिक्षण घेतलं. त्यानंतर निलंगा तालुक्यातील कासारशिर्शी येथे आजोळी राहून चौथीपर्यंतचं शिक्षण त्याने पूर्ण केलं.
UPSC चा निकाल जाहीर, उस्मानाबादचा गिरीष बदोले महाराष्ट्रात पहिला

चौथीमध्ये गुणवत्तेच्या बळावर तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने चालवण्यात येणार्‍या तुळजाभवानी सैनिकी स्कूलमध्ये त्याला प्रवेश मिळाला. पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण त्याने सैनिकी विद्यालयात घेतले. त्यानंतर लातूर येथील दयानंद महाविद्यालयातून अकरावी, बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर वैद्यकीय शिक्षणासाठी मुंबई येथील जे.जे. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुणे येथून गिरीश बदोले याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरु केली होती.

गिरीश बदोले याचे वडील दिलीप बदोले यांच्या मालकीची गावात केवळ दोन एकर जमीन आहे. आई-वडिलांनी मोलमजुरी करुन गिरीश आणि त्याच्या लहान भावाचे शिक्षण मोठ्या हिंमतीने पूर्ण केले. आई-वडिलांच्या कष्टाला राज्यात अव्वल येत गिरीश याने सन्मानित केले असल्याची भावना त्याचे चुलते प्रकाश बदोले यांनी व्यक्त केली.

कसगी गावातून अशा पद्धतीचे उत्तुंग यश संपादन करणारा गिरीश हा पहिला तरुण आहे. विश्वांजली गायकवाड पाठोपाठ राज्यात आणि देशात उस्मानाबादच्या यशाचा झेंडा निर्विवाद सिद्ध करणार्‍या गिरीश बदोले याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी नवा पायंडा घालून दिला आहे.