मुंबई : ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी 'महाराष्ट्र स्वाभिमान' या पक्षाची स्थापना केली. हा पक्ष भाजपप्रणित एनडीएमध्ये सहभागी होणार हे जवळपास निश्चित असून राणेंना राज्य मंत्रिमंडळात महत्त्वाचं खातं मिळणार आहे. त्यामुळे राणेंना कोणतं खातं देणार, यावरुन भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे.


आपल्याकडचं महत्त्वाचं खातं काढून राणेंना देऊ नये, यावरुन भाजपच्या गोटात सध्या अस्वस्थता आहे. त्यामुळे महत्त्वाचं खातं काढून घेऊ नये, यासाठी भाजप मंत्र्यांची धडपड सुरु आहे. राणेंना मंत्रिमंडळात घ्यावं, मात्र इतरांना धक्का लावू नये, अशी भाजप मंत्र्यांची भावना आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, नारायण राणेंना महसूल किंवा सार्वजनिक बांधकाम खातं मिळण्याची शक्यता आहे. सध्या ही खाती चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहेत. त्यामुळे यापैकी एक खातं राणेंना दिल्यास चंद्रकांत पाटील यांच्याकडील एक खातं जाण्याची शक्यता आहे.

'महाराष्ट्र स्वाभिमान' राणेंचा नवा पक्ष

काँग्रेसला रामराम केल्यानंतर नारायण राणे यांनी नव्या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र स्वाभिमान असं राणेंच्या नव्या पक्षाचं नाव आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली. लवकरच या पक्षाची नोंदणी करणार असल्याचं राणेंनी सांगितलं.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सिंधुदुर्गमधील जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर राणेंनी काँग्रेसला रामराम ठोकला. तसंच राणेंच्या भाजप प्रवेशाच्याही चर्चा सुरु होत्या. भाजपाध्यक्ष अमित शाहांची भेटही राणेंनी दिल्लीत जाऊन घेतली होती.

संबंधित बातम्या :

'महाराष्ट्र स्वाभिमान' नारायण राणेंचा नवा पक्ष


पक्ष स्थापनेच्या तासाभरात राणेंना एनडीएत येण्याचं आमंत्रण : सूत्र