मी बांगड्या भरलेल्या नाहीत, कार्यकर्त्यांनी शांत रहावं : उदयनराजे
एबीपी माझा वेब टीम | 22 Feb 2017 09:31 AM (IST)
सातारा : ताफ्यावर दगडफेक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंनी पोलिसात तक्रार दिली आहे. शिवाय आपण बांगड्या भरलेल्या नाहीत, पण भांडणातून काही मिळणार नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांनी शांत रहावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानादिवशीच राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना घडली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानावेळी उदयनराजे जावळी तालुक्यातील खुर्शी मुरा गावी भेट देण्यासाठी गेले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते वसंत मानकुमरे यांनी ताफ्यावर दगडफेक केली, असा आरोप आहे. उदयनराजे भोसले हे जावळी तालुक्यातील खर्शी या ठिकाणी गेले होते. त्यावेळी त्यांच्या समर्थकांकडून वसंत मानकुमरे आणि त्यांच्या पत्नींना धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप मानकुमरेंनी केला आहे. त्यामुळेच चिडलेल्या जमावाने उदयनराजे भोसलेंच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचं सांगण्यात येत आहे. तशी तक्रार देखील मानकुमरे यांनी मेढा पोलीस ठाण्यात दिली आहे. मानकुमरे समर्थकांनी थेट खासदार उदयनराजे यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याने काही काळ तणावाचं वातावरण तयार झालं होतं. उदयनराजेंनीही साताऱ्यात पोलीसांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे. शिवाय आपण बांगड्या भरलेल्या नाहीत, मात्र कार्यकर्त्यांनी शांत रहावं, असा आवाहनही उदयनराजेंनी केलं. या घटनेत त्यांचेच बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचाच हात असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. दरम्यान साताऱ्याचे खासदार हे दहशत माजवण्यासाठी जावळीत आले होते आणि त्यामुळेच वसंत मानकुमरे यांच्या समर्थकांनी आपला राग व्यक्त केला, असा पलटवार शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे. पाहा व्हिडिओ :