Bhandara : भंडाऱ्यात आज दोन ठिकाणी भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोघांचा चिरडून मृत्यू झाला आहे. एका घटनेत ट्रॅक्टरनं तर, दुसऱ्या घटनेत वाळूच्या टिप्परनं दुचाकीस्वाराला चिरडलं आहे. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला आहे. या अपघातातील मृतांमुळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Continues below advertisement

भंडाऱ्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू

भंडाऱ्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हे दोन्ही अपघात रात्री आठ वाजताच्या सुमारास घडले असून मृतक हे दुचाकीस्वार आहेत. पहिली घटना भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यात डोंगरगावजवळ घडली असून त्यात ट्रॅक्टरनं दुचाकीस्वार संजय खोब्रागडे (42) यांना चिरडलं. तर, दुसरा अपघात भंडारा ते लाखनी या राष्ट्रीय महामार्गावरील पलाडी गावाजवळ घडला. राष्ट्रीय महामार्गावर रॉंग साईड जाणाऱ्या भरधाव वाळूच्या टिप्पण दुचाकीस्वार राजू भोयर (45) यांना चिरडलं. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मोहाडी येथील घटनेतील मृत इसम हा मोहाडी तहसील कार्यालयात अर्जनवीस म्हणून काम करीत होता. तर, पलाडी गावाजवडील घटनेत मृत पावलेला इसम हा एका राईस मिलवर सुरक्षारक्षक म्हणून कर्तव्यावर जात असताना हा अपघात घडला. या भीषण अपघात प्रकरणी आंधळगाव आणि कारधा पोलिसात वाहन चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या अपघातामुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

गडचिरोलीत मालवाहू ट्रकने धडक दिल्याने सख्खे भाऊ जागीच ठार

गडचिरोली शहरात धक्कादायक घटना घडली आहे. मालवाहू ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना गडचिरोली शहरापासून एक किलोमीटर अंतरावर आरमोरी मार्गावर घडली आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शेतात पीक फवारणीसाठी गेल्यानंतर दुचाकीने घराकडे परत येत असताना मालवाहू ट्रकने धडक दिल्याने सख्खे भाऊ जागीच ठार झाले आहेत. पुरुषोत्तम बारसागडे आणि अंकुश बारसागडे अशी मृतांची नावे आहेत. ते गडचिरोली शहरातील हनुमान वार्ड प्रभागातील रहिवाशी होते. दोघे भाऊ फवारणीसाठी शेतात गेल्यानंतर घराकडे परत येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामुळं एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर घटनास्थळी मोठा जमाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच सावधानता बाळगल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

Continues below advertisement