अहमदनगर : अहमदनगरला बनावट दारुकांडातील मृत्यूचं तांडव काही थांबताना दिसत नाही. मंगळवारी पुन्हा दोघा अत्यवस्थ रुग्णांचा बळी गेल्यानं खळबळ उडाली आहे. दारुकांडात जिल्ह्यात आतापर्यंत 11 जणांचा बळी गेला आहे. नगरमधील जेऊर गटातील पांगरमल गावात पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर हा प्रकार घडला आहे.


पांगरमलच्या भास्कर अव्हाड यांचा खासगी रुग्णालयात मंगळवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अजूनही 10 जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

तर कौडगावला नरेन्द्र चकले यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झालाय. गेल्या तीन दिवसापासून चकले अत्यावस्थ होते. कौडगावला तीनच दिवसांपुर्वी बनावट दारुनं बाळासाहेब मदगे यांचा मृत्यू झालाय. त्यामुळे गावात शोकाकुल वातावरण आहे. तर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अजूनही तीन ते चार जणांचा बनावट दारुनं मृत्यू झाल्याची चर्चा आहे मात्र पोलीस दप्तरी त्याची नोंद नाही.

काय आहे प्रकरण?

निवडणूक प्रचाराच्या पार्टीदरम्यान अतिमद्यपानाने आतापर्यंत आठ जणांचा बळी गेला आहे. बनावट दारु प्यायल्याने ही घटना घडल्याचा आरोप आहे. याप्रकरणी चौकशीचे धागेदोरे थेट अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयापर्यंत पोहचले आहेत. अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनच्या आवारात बनावट दारुची विक्री सुरु असल्याचं उघड झालं.

कॅन्टीनमधून 12 प्रकारच्या विदेशी दारुच्या बाटल्यांची झाकणं, रिबॉटलिंग साहित्य, इसेन्स कलर असं अनेक साहित्य जप्त करण्यात आलं. शिवाय या कॅन्टीनमधून अनेक आधार कार्ड आणि द्रारिद्र्य रेषेखालील रेशन कार्डचा साठाही उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. त्यामुळे यामागे मोठं टोळकं असू शकतं असा संशय पोलिसांना आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केल्यानंतर ही गंभीर बाब समोर आली आहे. रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीत तसंच शहराच्या इतर परिसरात ही दारु सर्रास विकली जाते.