लातूर : रक्षाबंधन हा सण बहीण-भावाचं नातं साजरं करण्याचा सण आहे. मात्र याच सणाच्या दिवशी सख्ख्या बहीण-भावाचा नाल्यात पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे. सात आणि पाच वर्षाच्या या बहीण-भावाच्या मृत्यूमुळे लातूर जिल्ह्यातील निटूर गावावर शोककळा पसरली आहे.


निटूर येथे ग्रामपंचायतने गावाच्या कडेला दहा फूट खोल नाली केली आहे. काही ठिकाणी 'पाणी अडवा पाणी जिरवा' या मोहिमेअंतर्गत कामे करण्यात आली आहेत. या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. आज दुपारी सदानंद मठ जवळील जोया फकीर(सात वर्ष) आणि आदिल फकीर (पाच वर्ष) हे दोन चिमुकले खेळता खेळता नाल्यात पडले. यातच त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी निटूर येथे गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेनंतर नातेवाईकांनी मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयात आणून ठेवला आहे. ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे या चिमुकल्या बहिण-भावाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सरपंच आणि गुत्तेदार यांच्याविरोधात जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.

सध्या पोलीस अधिकारी गावात दाखल झाले आहेत. ते यातून मार्ग काढण्याचा प्रयास करत आहेत. घटनेची माहिती कळताच गावावर शोककळा पसरली आहे.