Tripura Violence : त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या विरोधात काढण्यात आलेल्या रॅलीला हिंसक वळण लागलं आहे. याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. रजा अकादमीची एवढी ताकद नाही, चार टाळकी नाहीत त्यांच्याकडे, त्याच्यामागे वेगळेच लोक आहेत, असं वक्तव्य संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना केलं आहे. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी राज्यातील विरधांना लक्ष करत निशणा साधलाय.


संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
भाजप जातीय दंगली, धार्मिक दंगलीशिवाय राजकारण करुच शकत नाही, भाजपच्या माध्यमातून दंगली घडवल्या जात असतील तर गृह मंत्रालय सक्षम आहे, सरकार सक्षम आहे. महाराष्ट्र अस्थिर करण्याचं मोठं कारस्थान आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या माध्यमातून सरकारला काय चरोट्या उठत नाही, आम्ही मनाने आणि कामाने खंबीर आहोत. आता दंगली घडवून अस्थिरता निर्माण करण्याचं यांचं कारस्थान दिसतंय.


हे ठरवून झालं आहे -
मराठवाड्यात, औरंगाबादच्या काही भागात, अमरावतीत असे प्रकार झाले, हे ठरवून झालं आहे. या राज्यातील विरोधी पक्षाने महाराष्ट्राल अशाप्रकारे चूर लावण्याचा प्रकार करु नये, महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला धक्का लावू नका. अमूक खातं कुणाकडे हे महत्त्वाचं नाही, महाविकास आघाडीचं सरकार आहे, त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. ते महत्त्वाचं आहे.


रजा अकादमीची एवढी ताकद नाही – संजय राऊत
दंगलखोरांचा बुरखा फाटेल, खरे दंगलखोर वेगळेच आहेत. मांजर डोळे मिटून दूध पित असलं तरी असे प्रकार कळतात. राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न, कायदा सुव्यवस्था बिघडवणं आणि राज्यपालांकडे निवेदन द्यायचं, हा खेळ आता जुना झाला, आम्ही माहीर आहोत. रजा अकादमीची एवढी ताकद नाही, चार टाळकी नाहीत त्यांच्याकडे, त्याच्यामागे वेगळेच लोक आहेत.


राज्यात अनेक ठिकाणी रॅलीला हिंसक वळण -
त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या विरोधात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात काढण्यात आलेल्या रॅलीला हिंसक वळण लागलं आहे. तोडफोड आणि जाळपोळ यासारख्या घटना घडल्या आहेत. मालेगाव, नांदेड, अमरावती, भिवंडी येथे मुस्लिम समाजानं मोर्चे काढले. ठिकठिकाणी निघालेल्या मोर्चांना हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं. मोर्चादरम्यान मालेगाव, नांदेड, अमरावतीत झालेली तोडफोड कॅमेऱ्यात कैद झाली असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. नांदेड शहरात काल मुस्लिम समाजानं काढलेल्या मोर्च्याला हिंसक वळण लागलं. शहरातल्या शिवाजीनगर, केळी मार्केट, देगलूर नाका परिसरात तुफान दगडफेक झाली. दगडफेकीत 2 पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झालेत. राज्यात काही ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ काही ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे.