उस्मानाबाद : सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे दरात सातत्याने घसरण होत आहे. हमीभाव, कर्जमाफी, फुकट बियाणे, शेततळे अशा घोषणांमुळे तर शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यातीलच आपण एक आहोत, असं म्हणत अडत व्यापाऱ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली.


उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील शुक्रवारची ही घटना आहे. दत्तात्रय गुंड असं या 32 वर्षीय व्यापाऱ्याचं नाव आहे. तरुण अडत व्यापार्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्यावर्षी सहा हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केलेला 800 क्विंटल हरभरा पडून असल्याचंही दत्तात्रय गुंड यांनी म्हटलं आहे.

दत्तात्रय गुंड यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप केले आहेत. ''सर्व व्यापारी आणि शेतकरी तुम्हाला चोर दिसतात. म्हणून तर त्या दोघांत भांडणे लावून आपण पाहत बसला आहात. आतापर्यंत व्यापार्‍यांनीच तारल्यामुळे शेतकरी जिवंत होता. नुकतेच जीवन चालू झाले होते. तुमच्या सरकारी धोरणाने आणि दुष्काळाने ते संपवलं आहे. आपल्या धोरणामुळे हा शेतकरी कायमचा संपावर जात आहे. आणखी कितीजण याच वाटेने जाणार, याची वाट पाहू नका. निर्णयात बदल करुन शेतकरी आणि व्यापारी दोन्ही जगवा,'' असं गुंड यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे.



दरम्यान, या चिठ्ठीत गुंड यांनी अत्यंत भावनिक शब्दात माफी मागितली आहे. ''सरकारची धोरणे, खासगी कर्ज आणि त्याच्या व्याजाला कंटाळून आत्महत्या करत आहे. कुटुंबीयांना त्रास देऊ नये,'' असंही दत्तात्रय गुंड यांनी चिठ्ठीत नमूद केलं आहे.

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सधन असताना डोक्यावर वाढलेला कर्जाचा ताण आणि शासनाच्या धोरणाचा फटका आपल्या मुलाला अशा वाईट निर्णयापर्यंत घेऊन गेला, याचे दुःख सरपंच असलेल्या त्यांच्या आईला लपवता आलं नाही.



दत्तात्रय गुंड यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. या प्रकरणातील सावकार शोधून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी गुंड यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.