रायगड : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी आपला मोर्चा कोकणात वळवला आहे. कोकणातील समुद्रकिनाऱ्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढली आहे. मुंबई - गोवा हायवेवर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


जवळपास 300 पोलिसांची अतिरिक्त फौज मुंबई-गोवा हायवेवर तैनात करण्यात आली आहे. तरीही मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी बघयाला मिळत आहे. थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटक हमखास गोव्याकडे धाव घेतात. त्यामुळेच या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना 29 ते 31 डिसेंबरदरम्यान बंदी

नववर्ष साजरं करायला जाणाऱ्या पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना 29 ते 31 डिसेंबरदरम्यान बंदी घालण्यात आली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तसे आदेशही जारी केले आहेत.

न्यू इअर सेलिब्रेशनसाठी अनेक जण मुंबईबाहेर जाण्याचा प्लॅन करतात. अशावेळी जड वाहनांमुळे प्रचंड गर्दीचा, ट्रॅफिक जामचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागतो. हे टाळण्यासाठी अवजड वाहनांना मुंबई-गोवा महामार्गावर 3 दिवस नो एन्ट्री असणार आहे.

नाताळ आणि विकेंड निमित्त कोकणात आणि पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले होते. यावेळी, मुंबई गोवा हायवेवरील पेण, वडखळ, माणगावदरम्यान वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. तर, मुंबई -पुणे एक्सप्रेस मार्गावर खोपोली आणि बोरघाट परिसरात वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तर, मुरुड नजीकच्या काशिद किनाऱ्यालगतच्या मार्गावर सुमारे 10 ते 12 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.