Todays Headline : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.

दोन्ही गटाकडून बैठकीचं आयोजन - निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तसेच शिवसेना नाव वापरण्यावरही निर्बंध लावण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णायानंतर दोन्ही गटाकडून बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पुढील रणनीतीवर चर्चा होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णायानंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर  दुपारी साडेबारा वाजता मातोश्रीवर बैठक बोलवली आहे. तर रविवारी वर्षा बंगल्यावर शिंदे गटाची संध्याकाळी सात वाजता बैठक होणार आहे. बैठकीला सर्व महत्वाचे नेते हजर राहणार आहेत. दरम्यान, सोमवारी दोन्ही गटाला पक्ष चिन्ह आणि नावाचा निर्णय होणार आहे.

कोजागरी पौर्णिमा -आज कोजागरी पौर्णिमा आहे. त्यानिमित्त खान्देश कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदिरात 56 भोग लावण्यात येणार आहे. तसेच मंदिर परिसरात दिवे लावण्यात येणार आहे. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा (Kojagari Purnima 2022) म्हणतात. कोजागरी पौर्णिमेलाच काही ठिकाणी कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima) तर काही लोक कोजागर पौर्णिमा (Kojagar Purnima) असे म्हणतात. कोजागरी पौर्णिमा शरद पौर्णिमा, आश्विन पौर्णिमा किंवा कौमुदी पौर्णिमा अशा वेगवेगळ्या नावांनी देखील ओळखली जाते. या दिवशी कोजागरी पौर्णिमा 9 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे. 

ईद-ए-मिलाद - आज देशभरा ईद-ए-मिलाद सण साजरा केला जाणार आहे. प्रेषित मोहम्मद यांच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ ईद-ए-मिलाद साजरा केला जातो. याला मिलाद ऊन नबी असेही म्हटले जात आहे. 

सात मृतदेहाची ओळख पटली -नाशिक येथील बस दुर्घटनेतील सात मृतदेहाची ओळख पटलेली आहे. अजूनही काही मृतांची ओळख पटलेली नाही, आज काही मृतांचे नातेवाईक नाशिकमध्ये येणार आहेत. त्याशिवाय विरोधीपक्ष नेते अजित पवार नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे.  

अजित पवार बारामती दौऱ्यावर -विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर असणार आहेत. बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर येथे विविध ठिकाणी उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते होईल. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 61 व्या गळीत हंगामाचे मोळी पूजन अजित पवारांच्या हस्ते होणार आहे. तसेच हंगाम शुभारंभ निमित्ताने अजित पवार शेतकरी मेळावा घेणार आहेत. 

कास महोत्सव शेवटचा दिवस - आज कास महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. शंभूराज देसाई आणि उदयनराजे एकत्र कास महोत्सव येथे जाणार आहेत. 

जगदंबा देवीचा "शांती उत्सव" -आजपासून खामगाव शहरात आराध्य दैवत असलेल्या जगदंबा देवीचा "शांती उत्सव" सुरू होत आहे, संपूर्ण भारतात नवरात्री नंतर कोजागिरी पौर्णिमा ते पुढील दहा दिवस हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. कोरोना नंतरच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. देवीची स्थापना झाल्यावर हा उत्सव 20 ऑक्टोबर पर्यंत सुरू असेल.. परिसरात हा उत्सव "मोठी देवी उत्सव " म्हणून प्रसिद्ध आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा 66 गळीत हंगाम, अजित पवारांची उपस्थिती  - 

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 66 गळीत हंगामाचे मोळी पूजन अजित पवारांच्या हस्ते होणार आहे. 30 सप्टेंबर रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या हद्दीतील 10 गावे माळेगाव सहकारी साखर कारखान्याला जोडण्याचा निर्णय आवाजी मतदानाने संचालक मंडळाने घेतला आहे. या निर्णयाला सभासदांनी कडाडून विरोध केला होता. मागील वर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला होता. अनेक सभासदांचा ऊस कारखान्याला जायला उशीर झाला.. त्यामुळे ही नवीन 10 गावे जोडू नका असे सभासदांनी सांगितले तरी देखील आवाजी मतदानाने संचालक मंडळाने निर्णय घेऊन सभा गुंडाळली होती. वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ पाहायला मिळाला होता.. या 10 गावांचा फायदा कारखनायच्या निवडणुकीत करून घेण्यासाठी हा घाट घातल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.  मोळी पूजनाच्यावेळी अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. विरोधी पक्ष नेत्याने लोकशाही जिवंत ठेवावी यासाठी जनमत लक्षात घेऊन पुढील निर्णय घ्यावा असे आवाहन मीडियाच्या माध्यमातून माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे यांनी केलं आहे. त्यामुळे अजित पवारांच्या उद्याच्या सभेकडे सभासदाचे लक्ष लागले आहे.

शिवाजीराव पंडित यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा..

माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या 85 शिवाय वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा साजरा होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला रावसाहेब दानवे पाटील, श्रीनिवास पाटील धनंजय मुंडे आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असतील हा कार्यक्रम गेवराई शहरातील आर बी अट्टल महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये सकाळी 11 वाजता होईल. 

अमित ठाकरे नांदेड दौऱ्यावर -राज ठाकरे यांचे सुपुत्र व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज नांदेड जिल्हा दौऱ्यावर. महासंपर्क अभियानातून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची पुनर्बांधणी करण्यासाठी अमित ठाकरे यांचा दौरा.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून गुजरात दौऱ्यावर -

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत.  9 ऑक्टोबर रोजी, संध्याकाळी 5:30 वाजता, पंतप्रधानांच्या हस्ते मेहसाणामधील मोढेरा येथे अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी होणार आहे. त्यानंतर मोधेश्वरी माता मंदिर येथे संध्याकाळी 6:45वाजता  देवीचे दर्शन घेऊन पूजा अर्चना करतील.  त्यानंतर साडे सात वाजता सूर्य मंदिराला भेट देतील.

नागपूर डाक क्षेत्राद्वारे राष्ट्रीय  टपाल सप्ताहाचे आयोजन

नागपूर  डाक  क्षेत्राद्वारे 9 ते 13 ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय  टपाल   सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून यादरम्यान आठवडाभर  विविध उपक्रमांद्वरे हा सप्ताह साजरा करुन विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यात डाकसेवा अधिक लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने नागपुर क्षेत्रीय विभाग कार्यरत असेल, असे प्रतिपादन  नागपूर  क्षेत्राच्या पोस्टमास्टर जनरल (विदर्भ क्षेत्र) शोभा मधाळे यांनी आज केले. सिविल लाईन्स येथील प्रधान डाक घर येथे राष्ट्रीय डाक  सप्ताहासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. याप्रसंगी  टपाल  सेवा विभागाचे संचालक महेंद्र गजभिये , वरिष्ठ टपाल अधिक्षक रेखा रिझवी प्रामुख्याने उपस्थित होत्या.

आरएसएस प्रमुख मोहन भागवत कानपूर दौऱ्यावर -

आरएसएस प्रमुख मोहन भागवत आज कानपूर दौऱ्यावर आहेत. ते महर्षी वाल्मीकि जन्मोत्सव कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. 

 अमित शाह आसाम दौऱ्यावर -केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आसाम दौऱ्याचा आज तिसरा दिवस आहे.

दुसरा एकदिवसीय सामना - पहिल्या एकदिवसीय सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्यानं भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. तर दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्यानं दक्षिण आफ्रिकेचा संघ उतरणार आहे. दुपारी दीड वाजता सामना होणार आहे.