मुंबई : भारतातील अनेक लोक 21 व्या शतकातही अंधश्रद्धेच्या विळख्यात कसे अडकले आहेत याचे वास्तव दाखवणारे धक्कादायक उदहारण समोर आले आहे. कर्नाटकातील कलबुर्गीमध्ये सूर्यग्रहणादरम्यान अंधश्रद्धेचं भीषण वास्तव समोर आलंय. सूर्यग्रहण काळात दिव्यांग मुलांना पुरुन ठेवण्यात आलं होतं. हे चित्र पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.


कर्नाटकमधील कलबुर्गी जिल्ह्यातील ताज सुलतानपूर गावात ग्रहणाच्या दिवशी धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिओ झालेली मुले, अपंग मुले, मतिमंद मुले,आजारी मुले याना गळ्यापर्यंत मातीत गाडल्यास मुले बरी होतात अशी अंधश्रद्धा असल्यामुळे हा प्रकार घडला आहे. मुलांना तहान लागल्यास पालक आणि अन्य मंडळी पाणी पाजवत असलेले पाहायला मिळाले.सूर्यग्रहण सुरू झाल्यापासून ग्रहण संपेपर्यंत निष्पाप लहान मुलांना हा अघोरी प्रकार सहन करायला लागला.

गावातील नागरिकांकडूनच त्यांना समजले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती दिली. माजी आमदार बी.आर.पाटील यांनी घटनास्थळी पोहोचून मुलांना बाहेर काढण्यासाठी पालकांना विनंती केली.

सुर्यग्रहणाला भारतात धार्मिक महत्व आहे. अनेक ठिकाणी ग्रहणकाळात प्रार्थना केल्या जातात. नाशिकमध्य गोदातीरावर एकीकडे मंत्रोच्चार पठण सुरू होतं.नाशिकमध्ये ग्रहण काळात दोन विरोधाभासी चित्रं पाहायला मिळाली. पंचवटीत रामकुंडावर सकाळपासून स्नान करण्यासाठी नागरिकांनी गर्दी होती. तर मंदिरांबाहेर भाविक होम हवन, जपताप करत असल्याचं दिसून आलं. दुसऱ्या बाजूला अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून ग्रहणाबाबत जनजागृती करण्यात आली.

पुण्याच्या मावळमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नऊ व्यक्तींचे फोटो, लिंबू आणि काळी बाहुली खिळ्याने अशोकाच्या झाडावर ठोकण्यात आल्यात. तसंच नारळांनी भरलेलं गाठोडंही झाडाला बांधण्यात आलं असून त्यातही नऊ व्यक्तींचे फोटो आढळलेत. तुंग येथील इसार हायस्कुल शेजारील हा प्रकार पाहून परिसरातील व्यक्तींना धक्का बसला. हा सर्वप्रकार जादूटोणा, भानामती अथवा करणी सदृश्य असल्याचं संबंधित नऊ व्यक्तीचं म्हणणं आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या कानावर ही बाब पडताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी अंधश्रद्धेला खतपाणी न घालता, अशोकाच्या झाडाला खिळ्याने ठोकण्यात आलेल्या सर्व वस्तू स्वतः काढून जप्त केल्या. हे पाहून ग्रामस्थांमधील भीती दूर झाली

आपण कितीही पुरोगामीत्वाच्या गोष्टी करत असलो तरी आपल्यातीलच काही अजूनही अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकले आहेत.