सोलापूर : देश विदेशात पुरातन वस्तू आणि वास्तूला आपल्या वैभवशाली संस्कृतीचे प्रतीक म्हणून त्यांना चांगल्या पद्धतीने जतन केले जाते. मात्र वारकरी संप्रदायाच्या नावाने सुरु असणाऱ्या विकास कामात वारकरी संप्रदायाचे वैभवच नामशेष होण्याच्या मार्गावर असताना आता पुरातत्व विभाग ही विहीर वाचवायला पुढे आला असून सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना एक पत्र देत ही बाजीराव विहीर वाचवण्याची विनंती केली आहे.


दरम्यान या विहिरीचा इतिहास आता नव्याने समोर आला असून या विहिरीचे बांधकाम 1811 साली झाल्याचे पुरावे समोर आले आहेत. दुसरे बाजीराव पेशवे आषाढी वारीसाठी पंढरपूरला नियमित वारीला येत असताना त्यांनी ही विहीर व 15 बिघे जमीन त्या काळातील सरदार खाजगीवाले यांचेकडून घेत ती विठ्ठल मंदिराला दिली होती. विठुरायाला रोज लागणाऱ्या तुळशी व फुलांची सोय या विहिरीच्या पाण्यावर शेजारील जमिनीत करून त्याचा वापर देवासाठी करावा अशी बाजीराव पेशवे यांची संकल्पना होती. त्यानुसार त्यांनी या जमीन व विहिरीच्या बदल्यात खाजगीवाले यांना 15 बिघे जमीन देताना विहिरीचे वेगळे 400 रुपये दिल्याचे पुरावे समोर आले आहेत . त्यामुळे ही विहीर थेट विठ्ठलाची विहीर अशी त्याकाळी ओळखली जात असल्याचे इतिहास अभ्यासक व मोडी लिपीचे तज्ज्ञ राज मेमाणे यांनी सांगितले आहे. याबाबतचे सर्व पुरावे मेमाणे यांच्याकडे असून त्यांनी याबाबतचे एक पत्र पुरातत्व विभागाला लिहिल्यावर पुरातत्व विभागाने ही विहीर पुरातन असल्याचे मान्य करीत रस्त्याच्या बांधकामात पडली जाऊ नये अशी विनंती करणारे पत्र सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे.


सध्या वारकरी संप्रदायासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी कोट्यवधी रुपये खर्चून राष्ट्रीय महामार्ग 965 अर्थात संत ज्ञानेश्वर पालखी मार्गाचे काम हाती घेतले आहे. याच कामातील सर्व्हिस रोडमध्ये ही विठुरायाची विहीर येत असल्याने अधिकाऱ्यांनी ती पडण्याची तयारी चालवली होती. याच जागी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील उभे रिंगण होत असून वर्षानुवर्षे हे रिंगण बाजीराव विहीर रिंगण म्हणून ओळखले जाते. देवाची ही आखीव रेखीव बांधलेली विहीर वाचवण्यासाठी आता आमदार गोपीचंद पडळकर यांनीही नितीन गडकरी यांना पत्र लिहून विनंती केली आहे. या गावाला दिलेला सर्व्हिस रोड जर या विहिरीमागून घेतल्यास वारकऱ्यांचे वैभव असलेली ही विहीर पुढील शेकडो वर्षे अशीच राहू शकणार आहे .