प्रसंगी साखर कारखाने पेटवू , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ईशारा
एबीपी माझा वेब टीम | 04 Nov 2018 06:00 PM (IST)
सांगली जिल्ह्यातील ऊस दराचे आंदोलन चिघळत आहेत. पाच ते सहा दिवसांपासून ऊस वाहतूक आणि तोडणी शेतकरी संघटनांकडून बंद पाडण्यात येत आहेत.
सांगली : थकीत देणी व एफआरपी दिल्याशिवाय एकही साखर कारखान्यांचा धुराडा पेटू देणार नाही. प्रसंगी कारखाने पेटवू, असा इशारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर कारखान्यांवर मोटरसायकल रॅली काढली. ऊसाचे दर जाहीर झाल्याशिवाय कारखाने सुरू करू नये असे आवाहनही यावेळी स्वाभिमानी कडून करण्यात आले. सांगली जिल्ह्यातील ऊस दराचे आंदोलन चिघळत आहेत. पाच ते सहा दिवसांपासून ऊस वाहतूक आणि तोडणी शेतकरी संघटनांकडून बंद पाडण्यात येत आहेत. तर थकीत देणी व एफआरपी दिल्याशिवाय कारखाने सुरू करू नये. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी शेतकरी चळवळीला समर्थन देत कारखाने बंद ठेवले आहेत. त्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातील कारखाने बंद ठेवावे अशी भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्यांवर धडक देण्यास सुरुवात केली आहे. आज सांगलीतील वसंतदादा पाटील साखर कारखांन्यावर धडक देण्यात आली. यावेळी स्वाभिमानीचे शेकडो कार्यकर्ते या मोटर सायकल रॅलीत सहभागी झाले होते. कारखान्यासमोर एफआरपी व थकीत देणी देण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली. कारखाना प्रशासनाला कारखाना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.