Sujat Ambedkar On I.N.D.I.A. Alliance : तुम्हाला संधी दिली होती पुन्हा रडत येऊ नका.. पुन्हा रडत आलात तर ठोकून काढू.! असा इशारा सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी इंडिया आघाडीला (I.N.D.I.A. Alliance) दिला आहे. सुजात आंबेडकर यांनी कंधार-लोहा विधान सभा मतदारसंघात निर्धार मेळावा घेतला. त्यावेळी त्यांनी इंडिया आघाडीला इशारा दिला. सुजात आंबेडकर यांनी म्हटले की, दिल्लीतील एक व्यक्ती आहेत. ते भारत जोडो यात्रेवर निघाले आहेत. भारत जोडण्याआधी जाती तोडाव्या लागणार आहेत. त्यासाठी आंबेडकरवाद आणि बाबासाहेबांना जवळ घ्यावे लागेल, असेही त्यांनी म्हटले.


वंचित बहुजन आघाडीने इंडिया आघाडीत समावेश करण्याबाबत काँग्रेसला पत्र लिहिले होते. त्यावर अजूनही कोणता निर्णय झाला नाही. त्यावर वंचितने आक्रमक भूमिका घेतली आहे.  


आमचा लढा वंचितांचा...आणखी एक टर्म सत्तेबाहेर बसू


सुजात आंबेडकर यांनी म्हटले की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्र लिहून प्रस्ताव पाठवला आहे. त्यावर अजूनही काँग्रेसने अजूनही निर्णय घेतला नाही. आम्ही तर वंचित आहोत. आम्ही वंचितांचा लढा उभारत आहोत. आम्ही आणखी एक टर्म सत्तेबाहेर राहिलो तर आम्हाला काही फरक पडणार नाही. तुमच्या संस्था, सहकारी संस्था, नातेवाईक टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही पक्ष बदलत आहात, अशी टीका त्यांनी केली. दोन टर्म सत्ता गेल्यानंतर तुमच्या पक्षाची अवस्था दिसून आली आहे. आम्ही सत्तेत जाण्यासाठी आसूसलेलो नाहीत. आम्ही लढणं सोडणार नाहीत. 


काँग्रेसकडे अजूनही वेळ आहे...


काँग्रेसकडे अजूनही वेळ आहे. त्यांनी प्रस्तावावर विचार करावा असे आवाहन सुजात आंबेडकर यांनी केले. वंचितने आपली ताकद दाखवून दिली आहे. तुम्ही आम्हाला घेतलं नाही तरी आम्ही लढणं सोडणार नसल्याचे सुजात आंबेडकर यांनी म्हटले. पण, आम्ही लढलो आणि अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह 15-20 आमदार 25-30 खासदार घरी बसले तर आमच्याकडे रडत यायचं नाही. तुम्हाला संधी दिली होती, नंतर आम्ही रडगाणे ऐकणार नाही. पुन्हा रडलात तर ठोकून काढू असा इशाराही सुजात आंबेडकर यांनी दिला. 


राहुल गांधी यांच्यावरही टीका


सुजात आंबेडकर यांनी  राहुल गांधींवर टीका केली. राहुल गांधी यांनी द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडणार असल्याचे म्हटले होते. हे प्रेमाचे दुकान छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि मिझोरममध्ये उघडणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, छत्तीसगड, राजस्थानमध्ये असलेले दुकान बंद पडले. तर, मध्य प्रदेशमध्ये दुकान उघडण्याचीही संधी दिली गेली नाही. तेलंगणामध्ये भाजप नव्हता. बीआरएस आणि एमआयएम प्रमुख पक्ष होते. तिथे विजय मिळवला असला तरी मुख्यमंत्री म्हणून एबीव्हीपी, संघाची पार्श्वभूमी असलेल्या रेवंथ रेड्डीला संधी दिली गेली असल्याचे सुजात यांनी म्हटले. ही दुटप्पी भूमिका थांबवण्याची आवश्यकता असल्याचे सुजात यांनी म्हटले.