Nagpur News नागपूर : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात येऊ नये, मराठा समाजाला सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, अशा आशयाचे खास ठराव राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या येणाऱ्या अधिवेशनात पारित केले जाणार आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नववे अधिवेशन लवकरच अमृतसर मध्ये पार पडणार आहे. त्या अधिवेशनात मराठा समाजाला  (Maratha Reservation) ओबीसीमधून आरक्षण (OBC Reservation) देण्यात येऊ नये आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटू नये, असं ठराव घेण्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने ठरवल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी दिली आहे.


विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना या अधिवेशनात बोलावले जाणार असून. त्यांनी ठरावाला महत्त्व देऊन त्यासंदर्भात अनुकूल राजकीय प्रयत्न करावे, अशी अपेक्षाही राष्ट्रीय ओबीसी महासंघाने व्यक्त केली आहे.


नवव्या अधिवेशनाला सर्व राजकीय पक्षातील प्रमुखांनाही आमंत्रण


आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन सध्या राज्याचे राजकारण तापले आहे. अशातच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी आक्रमक पवित्रा घेत सरकारला अल्टीमेटम दिला आहे. दरम्यान मराठा समजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 20 जुलै रोजी सुरू केलेले आपले उपोषण स्थगित केलं आहे. त्यानंतर, आगामी रणनीती आखण्यासाठी ते सज्ज झाले असून आता जरांगे यांच्या शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ते पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असून 7 ऑगस्टपासून त्यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सोलापुरातून (Solapur) सुरुवात होणार आहे.


तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या भूमिकेला ओबीसी महासंघाने वेळोवेळी विरोध दर्शवला आहे. अशातच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नववे अधिवेशन लवकरच अमृतसर मध्ये पार पडणार आहे. या आधिवेशनात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत. याशिवाय देशपातळीवर ओबीसींची जात निहाय गणना करावी, केंद्रीय स्तरावर ओबीसी मंत्रालय स्थापन करावं, ओबीसींचा राजकीय आरक्षण बहाल करण्यात यावं असे इतर ठरावही या अधिवेशनात पारित केले जाणार असल्याची माहिती  राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ.तायवाडे यांनी दिलीय. अमृतसरमधील नवव्या अधिवेशनाला सर्व राजकीय पक्षातील प्रमुखांनाही आमंत्रण देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या