पंढरपूरमध्ये गॅस टंचाईचं संकट गडद! दोन दिवसात बहुतांश हॉटेल पडणार बंद, भाविकांचे हाल होण्याची शक्यता
इराण-अमेरिका-इस्रायल संघर्षाच्या झळा जगभरातील अनेक देशांना लागल्या आहेत. या युद्धाच्या परिस्थितीचा परिणाम आता भारतासह महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही जाणवू लागला आहे.
Solapur Pandharpur LPG Gas News : इराण-अमेरिका-इस्रायल संघर्षाच्या झळा जगभरातील अनेक देशांना लागल्या आहेत. या युद्धाच्या परिस्थितीचा परिणाम आता भारतासह महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही जाणवू लागला आहे. अनेक ठिकाणी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना लांबच लांब रांगा लावाव्या लागत असल्याचं चित्र समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना गॅस जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये देखील गॅस टंचाईचं संकट गडद झालं आहे. येत्या दोन दिवसात पंढरपुरातील बहुतांश हॉटेल पडणार बंद पडण्याची शक्यता आहे. यामुळं भाविकांचे हाल होणार आहेत.
बहुतांश हॉटेलकडे आता एक किंवा दोन दिवसाचा गॅस शिल्लक
सध्या सुरु असलेल्या गॅस टंचाईचा फटका आता पंढरपूरला येणाऱ्या भाविकांनाही बसण्यास सुरुवात झाली आहे. येत्या दोन दिवसात शहरातील बहुतांश हॉटेल बंद पडतील अशी अवस्था झाली आहे. त्यामुळं विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना आता सोबत येताना टिफिन घेऊन येण्याची वेळ येणार आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या शहरातील शेकडो हॉटेल ना मिळणारा व्यावसायिक गॅसचा पुरवठा जवळपास बंद झाला आहे. बहुतांश हॉटेलकडे आता एक किंवा दोन दिवसाचा गॅस शिल्लक असून नवीन गॅस मिळत नसल्याने हॉटेल बंद होण्यास सुरुवात झाली आहे.
रोज शहरात एक लाखापेक्षा जास्त भाविक पर्यटक येतात
सध्या रोज शहरात एक लाखापेक्षा जास्त भाविक पर्यटक येत असतात. यातच शनिवार रविवारी ही संख्या अडीच ते तीन लाखापर्यंत जात असते. आता गॅसचा पुरवठाच जवळपास बंद झाल्याने येणाऱ्या भाविकांना सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. किमान तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी तरी हॉटेल चालकांना थोड्या प्रमाणात व्यावसायिक गॅस चा पुरवठा सुरू केल्यास देशभरातून येणाऱ्या लाखो पर्यटक आणि भाविकांना त्रास होणार नाही अशी अपेक्षा हॉटेल चालक संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग बापट यांनी बोलून दाखवली आहे.
Temple Langar Impact: मंदिरं आणि गुरुद्वारांतील अन्नछत्रावर परिणाम
एलपीजी गॅस टंचाईचा परिणाम पुण्यातील मंदिरं आणि गुरुद्वारांमधील अन्नछत्रावरही दिसू लागलाय. या ठिकाणी दररोज हजारो गरजू लोकांना जेवण दिलं जातं. मात्र गॅस सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळं स्वयंपाकावर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी भंडारा किंवा लंगरमध्ये सध्या फक्त दाल आणि भात दिला जातोय, तर चपात्या देणं तात्पुरतं बंद करण्यात आल्याचंही समोर आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या





















