उजनीतून सोडलेलं पाणी कर्नाटकने अडवलं, सोलापूरचे शेतकरी पाण्यापासून वंचित, शेकडो हेक्टर शेती धोक्यात
उजनी धरणातून सोडलेले पाणी कर्नाटकने आडवल्याने महाराष्ट्रातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहिल्याने शेतकरी आक्रमक झालेत.
Solapur : कर्नाटकच्या आडमुठ भूमिकेमुळं महाराष्ट्रातील सोलापूरचे शेतकरी पाण्यापासून वंचित राहत आहेत. उजनी धरणातून सोडलेले पाणी कर्नाटकने आडवल्याने महाराष्ट्रातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहिल्याने शेतकरी आक्रमक झालेत. कर्नाटक सरकारने भीमा नदीवर उमराणी गावाजवळ नव्याने उभारलेल्या बंधाऱ्यामुळं महाराष्ट्रातील 9 गावांना फटका बसला आहे. उमराणी गावाजवळ 1 टीएमसी पाणी अडवल्याने दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती धोक्यात आली आहे.
विषय अधिवेशनात मांडून शेतकऱ्यांना पाणी मिळवून द्यावे
आमच्या लोकप्रतिनिधीना आमची विनंती आहे की हा विषय अधिवेशनात मांडून शेतकऱ्यांना पाणी मिळवून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कर्नाटक सरकार हुकूमशाही करत आहेत त्यामुळे आपल्या सरकारने लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सोलापुरातील स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.
मंद्रूपसह आठ गावांच्या पिण्याचा पाणीपुरवठा बंद
उजनी धरणातून भीमा नदीत चार हजार 400 क्युसेक पाणी सोडले. मात्र, कर्नाटकने त्यांच्या उमराणी बंधाऱ्यात हे पाणी अडवले आहे. त्यामुळे खालील गावांतील शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर मंद्रूपसह आठ गावांच्या पिण्याचा पाणीपुरवठा बंद पडला आहे. याबाबत प्रशासनाने सरकारकडे बोट दाखवल्याच्या लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. सहा फेब्रुवारी रोजी उजनीतून भीमा नदीत चार हजार 400 क्युसेक पाणी सोडण्यात आले. मात्र, कर्नाटकने त्यांच्या उमराणी बंधाऱ्यात पाणी अडवले आहे. त्यामुळे हे पाणी खाली पोचू शकले नाही. परिणामी खालील लवंगी, पाटीलनगर, कारकल, औज, कुरघोट, टाकळी, बरूर, चिंचपूर येथील पिके धोक्यात आली आहेत. भीमा नदी कोरडी पडल्याने शेतीचा पाणीपुरवठा थांबला आहे. तर मंद्रूपसह या गावांतील पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही बंद पडला आहे. याबाबत मंद्रूपसह परिसरातील शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनालाही निवेदन दिले आहे. परंतु अद्याप उमराणी बंधाऱ्यातून पाणी खाली न सोडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
दरम्यान, कर्नाटकने उजनी धरणाचे पाणी अडवल्याने सोलापुरचे लोकप्रतिनिधी देखील आक्रमक झाले आहेत. पाणी अडवल्याने प्रशासनाने उजनीतून पाणी सोडणे थांबवले आहे. त्यामुळे सादेपूरखालील गावांतील ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही. खाली पाणी सोडण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी दिली आहे.

























