सोलापूर : चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे असतात, जशी भरती येते तशी ओहोटीसुद्धा येते, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी भाजप सरकारला दिला आहे.


भाजप सरकार हे लोकहितकारी नाही. समविचारी पक्षांनी एकत्र येऊन यांना हटवलं पाहिजे असंही अजित पवार म्हणाले. जशी भरती येते, तशी ओहोटीसुद्धा येते. चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे. दिवस बदलायला वेळ लागणार नाही. हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं, असं अजित पवार म्हणाले.

नुकत्याच झालेल्या भाजपच्या महामेळाव्यात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली होती. त्याला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. सोलापुरात अजित पवार यांच्या हस्ते ब्रह्मदेव माने बँकेच्या शाखेचं उद्धाटन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.

शिवसेनेला गांडूळ म्हणणाऱ्या अजित पवारांवर चंद्रकांत पाटलांनी हल्लाबोल केला. शिवसेनेला गांडूळ म्हणणारे या राज्याला लागलेली वाळवी आहेत, असा टोला चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना लगावला होता.

हल्लाबोल करणाऱ्यांनी इतकी वर्ष स्वतःचा गल्ला भरुन घेतला, अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादीवर टीका केली होती. भुजबळांच्या बाजूला अजून दोन-तीन कोठड्या रिकाम्या आहेत, असा इशारा चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना दिला होता.