दोन एकरवरील केळीची बाग अज्ञाताने टाकली तोडून, शेतकऱ्याचं 10 लाख रुपयांचं नुकसान, करमाळ्यात धक्कादायक प्रकार
करमाळा तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात व्यक्तीने दोन एकरवर असणारी केळीची बाग तोडून टाकली आहे. शेतकऱ्याचं तब्बल 10 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे.
Solapur Agriculture News : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात व्यक्तीने दोन एकरवर असणारी केळीची बाग तोडून टाकली आहे. शेतकऱ्याचं तब्बल 10 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. केळी पिकाला पाणीपुरवठा करण्यासाठी बसवण्यात आलेल्या ठिबक सिंचनचा संच देखील ठिकठिकाणी तोडण्यात आला आहे. शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
पिकाला पाणीपुरवठा करण्यासाठी बसवण्यात आलेला ठिबक सिंचन संचही तोडला
करमाळा तालुक्यातील खातगाव येथे अज्ञात व्यक्तीने दोन एकर क्षेत्रातील केळी बाग कोयत्याने तोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत शेतकरी भारत शंकर क्षीरसागर यांचे अंदाजे 10 लाखांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. क्षीरसागर यांच्या दोन एकर क्षेत्रावर मायक्रोसन जातीची अंदाजे 2400 केळी लागवड करण्यात आली होती. अज्ञात व्यक्तीने कोयत्याने झाडे तोडून बागेचे नुकसान केले. तसेच केळी पिकाला पाणीपुरवठा करण्यासाठी बसविण्यात आलेल्या ठिबक सिंचन संच ही ठिकठिकाणी तोडण्यात आला आहे.
करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
भारत क्षीरसागर हे गावातील दुसऱ्या शेतात दिवसभराची कामे उरकून सायंकाळी सुमारे पाच वाजता फेरफटका मारण्यासाठी संबंधित शेतात आले असता त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. बागेची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे पाहून त्यांनी तात्काळ नातेवाईकांसह करमाळा पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान करण्याचे प्रकार वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अचानक चांगले पिक आले असताना त्यावर किटकनाशके फवारणे किंवा पिकांची तोडणी करणे अशा प्रकारचे प्रकार घडत असल्याचे समोर येत आहे. बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात मेहनती शेतकरी किरण बर्डे यांच्या द्राक्षबागेवर अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या अंधारात तणनाशक फवारल्याने संपूर्ण बाग उद्ध्वस्त झाली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील कोरफळे येथे देखील अज्ञात व्यक्तीने द्राक्षाची बाग फवारल्याची घटना घडली होती. एका मेहनती शेतकऱ्याने मोठ्या कष्टानं घाम गाळून पिक आणले होते. मात्र, समाजातील वाईट प्रवृत्तीने असा प्रकारे पिकाचे नुकसान केले होते. गेल्या काही दिवसापासून अशा घटना वारंवार होत असल्याचे दिसत आहे. कत्यामुळं सरकारनं प्रशासनानं अशा घटनांची गंभीर दखल घ्यावी, तसेच या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असी मागणी केली जात आहे.
























