कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणी वितरण विभागाच्या अक्षम्य कारभारामुळे, कल्याण पूर्वेतील गवळीनगर भागातील रहिवाशांमध्ये खळबळ उडाली. कारण मंगळवारी सकाळी या भागात पिण्याच्या पाण्याच्या नळातून चक्क जिवंत साप बाहरे आल्याची धक्कादायक घटना घडली.


गवळीनगर (आमराई) हा प्रभाग क्रमांक 99मध्ये मोडतो. तिथल्या गुलमोहर सोसायटी नामक चाळीतील घरात हात-पाय धुण्यासाठी नळ चालू केला असता, त्यातून जिवंत साप बादलीत पडला. साप पाहून भेदरलेल्या गृहिणीने आरडाओरडा केल्यानंतर रहिवाशी घराबाहेर पडले.



काही तरुणांनी त्या सापाला सुखरूप निर्जनस्थळी सोडून दिलं. तर काहींनी पुरावा म्हणून या सापाची व्हिडीओ क्लिप बनवून सोशल मिडीयावर पोस्ट केली. तसंच या सापाचा व्हिडीओ महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आली आहे.

परिसरातील अनेक ठिकाणी पाईपलाईनमध्ये लिकेज आहेत. मात्र त्याची दुरुस्ती केली जात नाही. या लिकेजमधूनच हा साप आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेनं आतातरी जागं व्हावं, अशी मागणी नागरिक करत आहेत.