सिंधुदुर्ग : काँग्रेसचे नेते नारायण राणे भाजपच्या उंबरठ्यावर आहेत का, असा प्रश्न पडला आहे. कारण आधी त्यांनी गडकरींच्या स्वागतसाठी बॅनरबाजी केली. ज्यातून काँग्रेसचा हात गायब होता. मात्र राणे एवढ्यावरच थांबले नाहीत तर कुडाळच्या कार्यक्रमात त्यांनी थेट नरेंद्र आणि देवेंद्र सरकारचं तोंडभरुन कौतुक केलं.


केंद्रातील आणि राज्यातील सरकार विकासकामं करत असल्याचं प्रमाणपत्र राणेंनी देऊन टाकलं आहे. याशिवाय नितीन गडकरी विकास पुरुष असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

विशेष म्हणजे एरवी शिवसेनेवर अतिशय कडवट शब्दात टीका करणाऱ्या राणेंनी भाषणात मात्र उद्धव यांचं आदरानं नाव घेऊन राजकीय संकेत पाळला.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा कार्यक्रम कुडाळमध्ये झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे तब्बल 12 वर्षानंतर एकाच मंचावर आले. मात्र कार्यक्रमापूर्वी भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.



भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर राणे समर्थकही आक्रमक झाले आणि त्यांनीही घोषणाबाजी केली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर कार्यकर्त्यांना शांत करण्यात आलं. पोलिसांनी अनुचित घटना टाळण्यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंतांना ताब्यात घेतलं.

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर!

उद्धव ठाकरेंसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुनील प्रभू, रामदास आठवले सोहळ्याला उपस्थित होते. नारायण राणे शिवसेना सोडून गेल्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत व्यासपीठावर येण्याची ही पहिलीच वेळ होती.

कुडाळच्या बस डेपो मैदानावर हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमासाठी 400 हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले होते.

राणेंच्या पोस्टरवर मुख्यमंत्री आणि गडकरी


कार्यक्रमाच्या निमित्ताने काँग्रेस आणि शिवसेनेकडून जोरदार पोस्टरबाजी झाली. मात्र राणेंच्या पोस्टरवर काँग्रेसचा उल्लेख नसल्यामुळे पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. राणेंच्या पोस्टरवर मुख्यमंत्री आणि गडकरी यांचे फोटो झळकत आहेत.