नागपूर : अच्छे दिन आणायला पैसे लागतात पण राज्य सरकारच्या खिशाला भोकं आहेत, असं म्हणत राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी अर्वाच्य भाषेत सरकारवर टीका केली आहे.


राज्य सरकारच्या एकूण उत्पन्नापैकी 60 टक्के उत्पन्न सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि कर्ज फेडण्यासाठी जातं, तर उरलेलं 40 टक्के उत्पन्न हे जीएसटी आल्यापासून केंद्र सरकार घेऊन गेलं अशी परिस्थिती आहे, त्यामुळे आता राज्य सरकारला दिल्लीत जाऊन वाडगा घेऊन भीक मागून पैसे आणण्याची वेळ आली आहे, असं म्हणत अणेंनी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातले पैसे संपलेला नितीशकुमार सारखा माणूस मोदींना जाऊन मिळतो. त्याप्रमाणेच महाराष्ट्र हे कफल्लक राज्य आहे, असंही श्रीहरी अणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान विदर्भ राज्य आंदोलन समितीच्य़ा वतीने स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याच्या मागणीसाठी रक्ताने सह्या करुन पाठिंबा देण्यासाठी रक्ताक्षरी मोहिम आयोजित करण्यात आली. विदर्भातून 10 हजार लोकांनी आपल्या रक्ताने सही करून विदर्भाच्या मागणीला पाठिंबा देत असल्याचे पत्र विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांना सोपवलं. हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोपण्यात येणार आहे.