मुंबई : माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, असं अजब दावा करणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून तुफान स्तुतीसुमनं उधळली आहेत. केवळ वरवरची स्तुती नव्हे, तर शिवसेनेने संभाजी भिडेंची तुलना थेट बाजीप्रभू देशपांडे यांच्याशी केली आहे. संभाजी भिडे म्हणजे सध्याच्या युगातले बाजीप्रभू देशपांडे आहेत, असे ‘सामना’त म्हटले आहे.


भिडे गुरुजी यांच्याविषयी आम्हाला कमालीचा आदर आहे, असेही शिवसेनेने ‘सामना’मध्ये नमूद केले आहे.

सामनात काय म्हटलं आहे?

“हिंदुत्व, छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी कुणाची जीभ घसरलीच तर त्यांचा समाचार घेण्यासाठी भिडे गुरुजी उसळून उभे राहतात. त्या अर्थाने ते शिवसेनाप्रमुखांचे ‘धारकरी’ आहेत. काही प्रसंगी भिडे गुरुजी हे ‘मातोश्री’वर येऊन शिवसेनाप्रमुखांना भेटलेही आहेत. ते आमच्याशीही बोलत असतात. हिंदुत्व रक्षणाच्या बाबतीत भिडेगुरुजी हे सध्याच्या युगातील बाजीप्रभू देशपांडेच आहेत.”, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.

“भिडे गुरुजींची जिद्द व हिंमत वाखाणण्यासारखी आहे. त्यांचा कणा ताठ व बाणा अफाट आहे. त्यांच्या वाणीला तलवारीची धार आहे. त्याच तलवारीच्या धारेवरून त्यांचा प्रवास सुरू असतो, पण दुश्मनांच्या हातात तलवारी नसून बंदुका आणि बॉम्ब आहेत हेदेखील लक्षात घ्यायला हवे.” असे म्हणत, ‘सामना’त पुढे म्हटले आहे की, “कसाब आणि त्याची पाकिस्तानी टोळी मुंबईवर चाल करून आली ती हातात तलवार घेऊन नाही. एके–४७ आणि बॉम्बचा मारा करीत हे नराधम मुंबईत घुसले होते. या सगळय़ाचा विचार करूनच भिडे गुरुजींना त्यांची तलवारबंद फौज उभी करावी लागेल. आम्ही सदैव त्यांच्यासोबत आहोतच.”

आधीच संभाजी भिडे यांच्या वक्तव्याची सोशल मीडियातून खिल्ली उडवली जात असताना, शिवसेनेने सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून त्यांची पाठराखण केल्याने काय प्रतिक्रिया उमटतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

माझ्या बागेतील आंबे खाऊन अनेकांना मुलं झाली : संभाजी भिडे

अहमदनगरला आता फक्त अंबिका नगर म्हणायचं : भिडे गुरुजी

भिडेंच्या आंब्याच्या विधानानंतर सोशल मीडियावर विनोदाचा पाऊस