मुंबई | प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच या महामंडळाची स्थापना होणार आहे. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे.


महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळात गृहनिर्माण मंत्री आणि अशासकीय व्यक्तींचाही समावेश असेल. सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या घरांच्या योजना राबवण्यासाठी म्हाडा, एसआरए प्राधिकरणाचा आवाका कमी पडत असल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सरकारी गृहनिर्माण प्रकल्पांना गती देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, या निर्णयावरुन शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. मंत्र्यांचे अधिकार कमी करण्यासाठी महामंडळाचा घाट घातला जात असल्याचा आरोप परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केला आहे.