बीड / जालना :   पंतप्रधान सोलापुरात येतात, मात्र त्यांनी कधी मराठवाड्याचाही दौरा करावा, दुष्काळानं होरपळलेल्या मराठवाड्यातील लोकांच्या भेटी घ्याव्या, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. युतीची चर्चा गेली खड्ड्यात गेली पहिले माझ्या शेतकऱ्याचं काय करता ते बोला अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. शिवसेनेच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान ते आज बीडमध्ये बोलत होते. यावेळी पीकविम्यामध्ये हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा पुनरूच्चारही ठाकरे यांनी केला.


यंदा पाऊस कमी झाल्यानं ऐन हिवाळ्यातच शेतकऱ्यांवर दुष्काळाचं संकट ओढावलं आहे. त्यामुळे शिवसेनेतर्फे आज मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हौद आणि पाण्याच्या टँकरचं वाटप करण्यात आलं.

युतीची चर्चा गेली खड्ड्यात गेली पहिले माझ्या शेतकऱ्याचं काय करता ते बोला अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.  ववर्षात अच्छे दिनच नाही तर अच्छे वर्षही येऊ द्या अशी मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. आपला कोण आणि थापाड्या कोण हे आता ओळखायला पाहिजे. कोरडी भाषणं आणि कोरड्या घोषणांनी हंडे भरत नाही असा टोला  ठाकरेंनी लगावला. सरकारी यंत्रणेचा सुस्त अजगराला ढोसकण्यासाठी मी फिरतोय, असे ठाकरे यावेळी म्हणाले.

दुष्काळ पडल्यानंतरही दुष्काळ दिसायलाही यांना यंत्रणा लागते. केंद्राचे दुष्काळ पाहणी पथक काही कामाचे नाही, नुसतेच गाजर दाखविण्याचे काम आहे अशी टीका  ठाकरे यांनी केली. घोषणांचा बुडबुडा आहे, युतीच्या चर्चेआधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा. रोज वेगवेगळ्या देशात जाता आणि म्हणता देश बदल रहा है. पण देशवासियांची परिस्थिती काही बदलत नाही असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

खरं बोलून एकही मत मिळाले नाही तरी चालेल पण खोटं बोलून मिळालेली मते नकोत असे शिवसेनाप्रमुखांनी सांगितले होते. मी ‘मनकी बात’ नाही, ‘जनकी बात’ करतो असा टोला यावेळी त्यांनी लगावला.  ना तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकलात ना तुम्ही राम मंदिराचा मुद्दा सोडवू शकलात. जर निर्णय न्यायालय देणार असेल तर मग तुम्ही जाहिरनाम्यात राम मंदिराचे वचन का दिलेत ? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरेंनी विचारला.

जालन्यात काय म्हणाले उद्धव ठाकरे  
- दुष्काळी मराठवाडा आणि माझं फिरणं नवीन नाही
- शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना जे जे करता येईल ते करेल
- न्याय हक्क मागून मिळत नसेल तर थंड राहून कसे चालेल, पेटवा रान
- राफेल घोटाळा झाला का नाही, शेतकऱ्यांना उद्देशून सवाल ?
- दानवे ,रडताय साले म्हणतात, तुमची सुद्धा रडायची वेळ येईल, हा अन्नदात्याचा अपमान
- मला वाटलं मोदी दुष्काळासाठी काही बोलतील, सबंध भाषणात ते दुष्काळावर काही बोलले का ?
- आता जनतेवर मोहिनी अस्त्र चालणार नाही
- जे आम्हाला करता येणे शक्य तेवढे करू, माझी मदत कमी पडणार आहे
-  मी जे फिरतोय, ते यंत्रणेला जाग करण्यासाठी
- हे करतोय आमची ताकत नाही, हे ऋण व्यक्त करण्यासाठीची मदत
- धीर सोडू नका शेतकऱ्यांना आवाहन