मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकता याव्यात यासाठी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे नेते रणनिती आखत आहेत. दोन्ही पक्षांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून इनकमिंग सुरु आहे. त्यामुळे नव्याने भरती केलेल्या नेत्यांना मतदारसंघ उपलब्ध करुन देण्यासाठी दोन्ही पक्ष तडजोड करत असल्याची माहिती मिळाली आहे.


शिवसेना - भाजपमध्ये 20 ते 25 जागांची अदलाबदली होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन्ही पक्षात झालेलं इनकमिंग आणि मागील निवडणुकीत मिळालेल्या मतांची टक्केवारी या निकषांवर ही अदलाबदली होणार आहे.

2014 ला वडाळा विधानसभा मतदारसंघात त्यावेळी काँग्रेसच्या तिकीटावर लढणारे कालिदास कोळंबकर निवडून आले होते. भाजपचा उमेदवार येथे फक्त 700 मतांनी दुसऱ्या क्रमांकावर होता. युतीत ही जागा परंपरागतरित्या शिवसेना लढवत होती. परंतु विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यांच्या भाजप प्रवेशामुळे ही जागा भाजपला सुटण्याची शक्यता आहे. तर सिल्लोडची जागा भाजपकडे असूनही विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्या शिवसेना प्रवेशामुळे ही जागा आता शिवसेनेला सुटणार आहे.

वडाळा आणि सिल्लोडच्या सूत्राप्रमाणे विद्या ठाकूर यांची गोरेगावची जागा, वैभव पिचड यांची अकोले, संदीप नाईक यांची ऐरोली, राणा जगजितसिंह यांची उस्मानाबाद या जागांची अदलाबदल होऊ शकते.

फक्त मुंबईत 4 ते 5 जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. तर भाजपमध्ये इतर ठिकाणी नॉन परफॉर्मिंग विद्यमान आमदारांचा पत्ता कट होऊन उमेदवार बदलला जाऊ शकतो. जास्तीत जास्त युतीच्या जागा निवडून याव्यात यासाठी सेना -भाजपने जागा अदलाबदलीची रणनीती आखली आहे.