Shivrajyabhishek Din 2023: मराठ्यांच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना म्हणजे शिवरायांचा राज्याभिषेक.... रयतेच्या राज्याची स्थापना करणारे शिवराय 6 जून 1674 रोजी खऱ्या अर्थाने छत्रपती झाले. केवळ सत्तेसाठी, पदासाठी केलेलं हे बंड नव्हतं...  त्यामागे मराठ्यांच्या सार्वभौम राज्याची स्थापना झाल्याची दवंडी पिटवण्यात आली. पण पाचही शाहींच्या, दिल्लीश्वरांच्या छाताडावर पाय ठेऊन रयतेचं स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवरायांना आपण छत्रपती झालो हे सांगण्याची काय गरज होती? रयत, मावळे आणि सहकारी जीवापाड प्रेम करत असताना शिवरायांना त्यासाठी राज्याभिषेक (Shivrajyabhishek Din)  करून घेण्याची गरज काय होती?


History Of Shivaji Maharaj Coronation : रयतेवर अत्याचार, त्यात स्वकीयांचा समावेश 


महाराष्ट्रातील जनता ही निजामशाह, आदिलशाह, कुतुबशाह आणि मोघलशाहीच्या घोड्यांच्या टापाखाली चिरडली जात होती. इथल्या रयतेवर अत्याचार होत होता, दिवसाढवळ्या आया-बहिणींची अब्रू लुटली जायची..... आणि विशेष म्हणजे या जुलमामध्ये आप्तस्वकीय मराठा सरदारांचा समावेश असायचा. दिल्लीश्वरांच्या फेकलेल्या तुकड्यावर काही मराठा सरदार त्यांच्यासाठी काम करायचे. हे सर्व समोर असताना शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली, रयतेचं राज्य आणलं. बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींना शिवबा आपले वाटायचे. 


History Of Shivrajyabhishek : अत्याचार करणारा बादशाह... अन् रयतेला वाचवणारा बंडखोर 


शिवरायांनी रयतेचं राज्य आणलं... इथल्या आया-बहिणींची अब्रू वाचवली, इथल्या मंदिरांतील देव सुरक्षित केले खरे.... पण त्यांच्या या कार्याला मान्यता मात्र मिळत नव्हती. आदिलशाह असो वा मुगलशाह, त्यांच्या फेकलेल्या तुकड्यावर जगणारे सरदार हे शिवरायांना बंडखोरच म्हणायचे. दख्खनच्या एका सरदाराचं बंडखोर पोर... असंच त्यांना ओळखलं जायचं. 


दिल्ली असो वा विजापूर.... इथल्या शाह्या या लोकांना लुटायच्या, त्यांच्यावर अत्याचार करायचे, तरीही ते सम्राट, महाराज किंवा राजा. औरंगजेबाने कितीही अत्याचार केला तरी त्याला इथलेच लोक बादशाह म्हणायचे... आणि शिवराय रयतेसाठी, धर्मासाठी काम करत असूनही त्यांना बंडखोर म्हटलं जायचं. मराठा सरदार हे स्वतःता आदिलशाह, औरंगजेबाचे निष्ठावंत सेवक मानायचे, मात्र शिवरायांच्या कामाला मान्यता द्यायचे नाही. नेमकं हेच चित्र बदलण्यासाठी शिवरायांनी राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला. 


राज्याभिषेक करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे इतर राज्यांकडून मिळणारी राजमान्यता. त्यामुळे शिवरायांच्या वटहुकूमांना, त्यांच्या निर्णयाला कायदेशीर मान्यता मिळणार होती. इतर राज्यांशी तह किंवा वाटाघाटी करताना, संवाद साधताना मान्यता मिळणार होती. 


Chhatrapati Shivaji Maharaj Coronation:  शिवराय छत्रपती झाले


दिल्लीच्या औंरग्याच्या छाताडावर बसून रयतेचं राज्य स्थापन करणारा आपला शिवबा राजा व्हावा असं आऊसाहेबांना वाटायचं, लहान का असेना पण आपलं स्वतंत्र्य राज्य असावं असं शिवरायांच्या सहकाऱ्यांना वाटायचं. त्यामुळे अखेर शिवरायांनी राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला. 


वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी, 26 एप्रिल 1645 रोजी शिवरायांनी आपल्या सवंडगड्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली होती. त्यानंतर 30 वर्षांच्या धगघगत्या संघर्षानंतर 6 जून 1674 रोजी शिवरायांनी राज्याभिषेक करुन घेतला आणि स्वतःला छत्रपती म्हणून घोषित केलं. आज या क्रांतिकारी घटनेला 349 वर्षे पूर्ण होत आहेत. साडेतीनशे वर्षापूर्वी घडलेल्या या घटनेचा दूरगामी परिणाम आजही होत असल्याचं जाणवतं. 


ही बातमी वाचा :