मुंबई : भाजप- शिवसेना युतीच्या सत्ता स्थापनेपासून रिक्त असलेल्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची माळ शिवसेनेचे विजय औटी यांच्या गळ्यात पडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे विजय औटी, काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांचे अर्ज आले आहेत. विधानसभेत भाजप- शिवसेनेचे बहुमत असल्याने औटी यांची निवड निश्चित मानली जात आहे.


विधानसभेचे अध्यक्षपद हे भाजपच्या कोट्यातून हरिभाऊ बागडे यांना मिळाले आहे. त्यामुळे सत्तेतील सहकारी शिवसेनेला उपाध्यक्षपदाची संधी मिळणार हे निश्चित होते.

राज्य विधानसभेच्या उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी काल सभागृहात केली. त्यानुसार आवश्यकता भासल्यास शुक्रवारी मतदान घेतले जाणार आहे. या निवडणुकीसाठीची नामनिर्देशनपत्रे गुरुवार 29 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 11.45 वाजेपर्यंत विधानमंडळाचे  प्रधान सचिव यांच्या दालनात सादर करायची होती. यात शिवसेनेचे विजय औटी, काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांचे अर्ज आले आहेत.

उमेदवारी माघारी घ्यावयाची असल्यास त्याबाबतची लेखी सूचना प्रधान सचिवांकडे  शुक्रवार दि. 30 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 10.30 वाजेपर्यंत स्वत: उमेदवाराने किंवा त्याच्या अनुमोदकाने आणून देणे आवश्यक आहे. निवडणुकीची आवश्यकता भासल्यास शुक्रवार दि. 30 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 1 वा या वेळेत विधानसभा सभागृहात मतदान होणार आहे.

विधानपरिषद उपाध्यक्षपदाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह
विधानपरिषद उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी अद्याप नोटीफिकेशन निघालेले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेतून नीलम गोऱ्हेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असले तरी शिवसेना समर्थक अपक्ष आमदार श्रीकांत देशपांडे देखील स्पर्धेत आहेत. तर शेकाप पक्षाचे आमदार जयंत पाटील देखील इच्छुक असल्याचे समजते. त्यामुळे उद्या यावर तोडगा निघाला तर निवडणुकीची प्रक्रिया होऊ शकेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.