Sanjay Raimulkar Agitation : समृद्धी महामार्गाच्या चुकीच्या कामामुळं शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप करत शिवसेनेचे मेहकरचे आमदार संजय रायमूलकर यांनी आमरण उपोषण सुरु केलं होत. हे उपोषण आज त्यांनी मागे घेतलं आहे. काल रात्री उशिरा अमरावती येथील विभागीय कार्यालयातून कामाचा आढावा घेण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. त्यानंतर आमदार संजय रायमूलकर यांनी आपलं उपोषण मागे घेलं आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पायलट प्रोजेक्ट  असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामाविरुद्ध कालपासून हे आंदोलन सुरु केले होतं. MSRDC कार्यालयासमोर शेतकऱ्यासंह आमदार रायमूलकर उपोषणाला बसले होते. शेतकऱ्यांच्या शेतातील शेतरस्ता, अंडरपासेस याचा आढावा घेण्याची रायमूलकर यांनी मागणी केली होती. समृद्धी महामार्गाच्या कामामुळं शेतकऱ्यांचे पिढ्यानपिढ्या असलेले पाण्याच्या वहिवाटीचे मार्ग, शेतात जाण्याचे रस्ते पूर्णतः बदलले आहेत. महामार्गाच्या खाली ठेवलेलं अंडरपास हे अतिशय छोटे आहेत. त्यामुळे त्यातून बैलगाडी सुद्धा जात नसल्याने शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी अर्धा किलोमीटर फेऱ्याने जावं लागत असल्याची तक्रार आमदार संजय रायमूलकर यांनी केली होती. 


काय आहेत शेतकऱ्यांच्या समस्या


समृद्धी महामार्ग हा नागपूर-मुंबई असा विशालकाय महामार्ग आहे. यावरुन धावणाऱ्या वाहनांचा वेगही तसा मोठा असणार आहे. त्यामुळं या महामार्गावरुन प्राणी किंवा वाहनांना अडथळा  होणार नाही म्हणून मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजूने 12 फूट उंच भिंती घेण्यात आल्या आहेत, ज्याला एक्सेस कंट्रोल असे म्हणतात. यामुळं मात्र शेतकऱ्यांचे असलेले जुने महसुली रस्ते तसेच पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यासाठीचा मार्ग संपूर्णपणे उध्वस्त झाले आहेत. शिवाय शेतकऱ्यांना समृद्धी महामार्ग पार करुन आपल्या शेतात जण्यासाठीचे मार्गही बदलले आहेत. अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी चक्क एक किलोमीटरपर्यंत दूरच्या मार्गानं जावं लागत आहे. तर अनेक ठिकाणी मार्गाच्या खालून ठेवण्यात आलेले अंडर पासेस इतके छोटे तयार करण्यात आले आहेत की त्यातून शेतकऱ्यांची बैलगाडी किंवा ट्रॅक्टरसुद्धा जाऊ शकत नाही. अशा सर्व समस्या घेऊन मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमूलकर यांच्या नेतृत्वात उपोषण करण्यात आले होते.