शिर्डी : अहमदनगरमध्ये बोअरवेलमध्ये पडलेल्या बालकाला सात तासांनी बाहेर काढण्यात आलं, मात्र दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला आहे. सात वर्षांच्या साई बारहातेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


अहमदनगरमधील कोपरगावमधल्या मुर्शदपूर गावातील घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. सोमवारी सकाळी सात वर्षांचा साई आजोबांसोबत शेतावर शेळ्या चरण्यासाठी गेला असताना बोअरवेलच्या खड्ड्यात पडला होता.

साधारण वीस फुटांवर अडकलेल्या साईला वाचवण्यासाठी अग्निशमन दल, पोलिसांसोबतच महसूल, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचेही प्रयत्न सुरु होते. बोअरवेलच्या खड्ड्यात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आल्याने सुरुवातीला साई आवाजाला प्रतिसादही देत असल्याचं सांगितलं जात होतं.

सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर साईला बाहेर काढण्यात आलं. त्याला तातडीने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.