राज्यातल्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी शरद पवार उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार
एबीपी माझा वेब टीम | 26 May 2019 03:55 PM (IST)
हाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी ही मागणी मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोमवारी (उद्या, 26 मे) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
पुणे : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी ही मागणी मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोमवारी (उद्या, 26 मे) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. सध्या राज्याच्या दुष्काळ दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी आज इंदापूरला भेट दिली. यावेळी शरद पवारांनी शेतकरी कर्जमाफीची मागणी केली. शरद पवार यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लगेच कर्जमाफी करावी, असेही सांगणार आहे. पवार म्हणाले की, सरकारकडे मोठ्या प्रमाणात धान्याचे साठे आहेत, धान्याची बिलकूल कमतरता नाही. त्यामुळे राज्यात जोवर दुष्काळ परिस्थिती आहे तोवर शासनाने अन्नधान्यांचा दुष्काळी भागात पुरवठा करावा, अशी मागणीदेखील करणार आहे. तसेच अन्नसुरक्षा कायद्यातील नियमाल बदल करुन अशा प्रकारे धान्य पुरवठा करणे शक्य असल्याचेही पवारांनी सांगितले. दरम्यान शरद पवारांनी इंदापूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागांना तिथले लोक मागतील तितके पाण्याचे टँकर पुरवण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या राष्ट्रवादीने खासगी संस्थांच्या मदतीने अहमदनगर आणि सातारा जिल्ह्यात पाण्याचे टँकर सुरु केले आहेत.