ईडीग्रस्त पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडेंनी अजितदादांच्या पक्षातून भाजपचा संसार करण्यापेक्षा तत्काळ भाजपत प्रवेश करावा, क्लीन चिट मिळेल आणि शांत झोप लागेल; शरद पवार गटाची खोचक टीका
'गुजरात वॉशिंग मशिन' मधून क्लिअरिटी मिळेल, तुम्हाला क्लीन चिट मिळेल आणि तुम्ही स्वस्थपणे उर्वरित आयुष्य काढू शकता, आनंदाने जीवन जगू शकता. तुम्हाला कुठलंही टेन्शन राहणार नाहीत, अशीही टीका केली आहे.

Sharad Pawar NCP Hit Out Ajit Pawar NCP: 'लग्न एकाशी आणि संसार एकाशी' असं करण्यापेक्षा अजित दादांच्या पक्षात राहून भाजपचा संसार करण्यापेक्षा प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी थेट भाजपमध्ये जावं. कारण भाजपमध्ये गेल्यामुळे थेट तुम्हाला संसारही चांगला करता येईल आणि उघडपणे तुम्हाला त्यांच्या भूमिका मांडता येतील, अशा शब्दात सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ता तथा संघटक विकास लवांडे यांनी खोचक टोला लगावला आहे. त्यांनी व्हिडिओ सोशल मीडियातून पोस्ट करताना जोरदार हल्लाबोल केला आहे.
म्हणून भाजपची मनधरणी करत आहात
लवांडे यांनी म्हटलं आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादांच्या पक्षाचे जे प्रमुख नेते स्वतःला म्हणतात, ते प्रफुल्ल भाई पटेल, खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे या चारही नेत्यांनी अजित दादांच्या पक्षात राहून भाजपचं काम करण्यापेक्षा, ईडीग्रस्त असल्यामुळे चौकशीच्या वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये आपण अडकला असल्यामुळे भारतीय जनता पार्टीची आपण मनधरणी करत आहात.
NCP च्या ' त्या ' 4 नेत्यांनी थेट भाजप मध्ये जावे. लग्न एकाशी आणि संसार दुसऱ्याचा करून दोन्ही घरची फसवणूक करू नये. थेट भाजप मध्ये प्रवेश केल्यास तुमचा राजकीय आणि व्यक्तिगत फायदाच होईल. क्लीन चिट मिळेल आणि शांत झोप लागेल. #NCP #Ajitpawar @AjitPawarSpeaks #BJP @BJP4Maharashtra… pic.twitter.com/ShmFvdmcHQ
— Vikas Lawande (@VikasLawande1) February 22, 2026
गुजरात वॉशिंग मशिन' मधून तुमची क्लिअरिटी मिळेल
विकास लवांडे यांनी पुढे म्हटलं आहे की, तुम्ही ज्या चौकशीच्या फेऱ्यांमध्ये, कारवाईच्या फेऱ्यांमध्ये अडकला आहात, त्याची सुटका भाजपच्या 'गुजरात वॉशिंग मशिन' मधून तुमची क्लिअरिटी मिळेल, तुम्हाला क्लीन चिट मिळेल आणि तुम्ही स्वस्थपणे उर्वरित आयुष्य काढू शकता, आनंदाने जीवन जगू शकता. तुम्हाला कुठलंही टेन्शन राहणार नाहीत. त्यामुळे तुम्ही तात्काळ भाजपमध्ये जावं. काहीही नुकसान होणार नाही महाराष्ट्राचं. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची फसवणूक करू नये, दिशाभूल करू नये, असा टोला लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या

























