शक्तिपीठचा मुद्दा तापला, एक इंचही जमीन देणार नाही, परभणीत शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांसोबत वादावादी
शक्तिपीठ महामार्गासाठी एक इंचही जमीन देणार नसल्याची भूमिका परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतली आहे.
Parbhani Shaktipeeth Highwa : शक्तिपीठ महामार्गासाठी एक इंचही जमीन देणार नसल्याची भूमिका परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतली आहे. प्रशासनकडून शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र, तो असफल झाला आहे. आज जिल्हाधिकारी आणि भाजप जिल्हाध्यक्ष यांच्या सोबत शेतकऱ्यांची वादावादी झाली. शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
शक्तिपीठला एक इंचही जमीन देणार नसल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले
परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ बाधित सर्व शेतकऱ्यांची आणि प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडली. यावेळी या बैठकीला जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी खासदार संजय जाधव यांच्यासह सर्व अधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी मोठ्या संख्येने या बैठकीला विविध पक्ष संघटना व सर्व गावातील शक्तीपीठ बाधित शेतकरी उपस्थित होते.
या बैठकीत पोलीस आणि महसूल प्रशासनाने सहजपुर येथे दाखवलेल्या दंडेलशाहीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच शक्तिपीठला एक इंचही जमीन देणार नसल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले यावेळी शेतकऱ्यांच्या भावना सरकार पर्यंत पोचवणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 5 मार्च रोजी मुंबईत याबाबत बैठक लावली आहे
या बैठकीत शेतकऱ्यांनी पूर्वीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जमीन मोजनीबाबत घेतलेली भूमिका मांडली यावर विद्यमान जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण चिडले आणि काही वेळ शेतकरी आणि जिल्हाधिकारी यांच्यात जोरदार वादावादी झाली. तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे हे भाजपचे कमळ चिन्ह लावून बैठकीला आले यावेळी ही शेतकरी आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार आक्षेप घेतला आणि तिघेही वादावादी झाली. शेवटी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 5 मार्च रोजी मुंबईत याबाबत बैठक लावली त्यात भूमिका मांडण्याचे ठरले आहे.
रत्नागिरी-नागपूर हा मार्ग उपलब्ध असताना नवीन शक्तिपीठ महामार्गाची गरज काय? शेतकऱ्यांचा सवाल
शेतकऱ्यांनी नोंदवलेल्या प्रमुख हरकतींमध्ये रत्नागिरी-नागपूर हा मार्ग उपलब्ध असताना नवीन शक्तिपीठ महामार्गाची गरज काय, यात 90 टक्के अल्पभूधारक शेतकरी आहेत, महामार्गामुळे शेतीचे दोन भाग होतील आणि शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होतील, अशी भीती व्यक्त केली. आमचा जीव गेला तरी चालेल; पण जमीन देणार नाही, अशा संतप्त शब्दांत शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
महत्वाच्या बातम्या:
Shaktipeeth Highway Protest: मोठी बातमी: परभणीत शक्तिपीठ जमीन मोजणी तात्पुरती स्थगित; तरीही आज रास्ता रोको, प्रशासनाच्या दंडेलशाहीचा करणार निषेध























