अकोला : प्रशासनात सुमारे 25 वर्षे काम केलेल्या अधिकाऱ्याने मंत्र्याच्या दबावाला बळी पडत स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज केल्याचे समोर आले आहे. अकोला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज केला आहे. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी नियमबाह्य कामांसाठी दबाव टाकल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.


डॉ. सुभाष पवार यांनी राज्याच्या ग्रामविकास खात्याच्या प्रधान सचिवांना स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज पाठवून, बांधकाम विभागाच्या नियमबाह्य निविदा मंजुरीसाठी डॉ. रणजित पाटील दबाव आणत असल्याचा आरोप राजीनामा पत्रात अगदी स्पष्टपणे केला आहे.

डॉ. रणजित पाटलांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचेही पवार म्हणाले. त्याचबरोबर, पालकमंत्रिपदाचा धाक दाखवत कारवाईच्या धमक्या देत असल्याचा गंभीर आरोप सुभाष पवारांनी केला आहे.

आता जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या लेटरबॉम्बमुळे गृहराज्यमंत्री रणजित पाटील हे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

रणजित पाटलांचं स्पष्टीकरण

“तक्रार निवरणासाठी आपण बसतो. लोकांचे प्रश्न मार्गी लावायचे असतात. यांच्याकडून अनुपालनच होत नाही. 25 पैकी दरवेळी 20 कामे झालेली नाहीत. आपण कागद पाहिलेत, तर कळेल. लोक दीडशे किलोमीटरवरुन येतात. एकदा झाले, दोनदा झाले, शेवटी तिसऱ्यांदा नाराजी व्यक्त केली. त्यांना दुखवायचे नव्हते. पण शेवटी लोकांची कामे झाली पाहिजे आणि निविदा वगैरे काहीच नाही. काही संबंधच नाही .हे सगळं जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी सगळ्यांच्या समक्ष झाले.”, असे स्पष्टीकरण रणजित पाटलांनी दिले.