सातारा: मी लोकांची कामं करतो म्हणूनच कॉलर उडवतो असं म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा कॉलर उडवली आहे. यावेळी त्यांनी साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीकास्त्र सोडलं.


शिवेंद्रराजे भोसले यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी उदयराजेंनी काल साताऱ्यात पत्रकार परिषद घेतली.

शिवेंद्रराजेंवर निशाणा

"आमदार-खासदार कोणीही होऊ शकतो. उदयनराजेंच्या ओटात एक आणि पोटात एक असं नसतं. यांच्या संकुचित बुद्धीला व्यापकता कधी येणार याची वाट पाहतोय. दिलदारपणा हवा. उगीच कॉलर उडवत नाही.  लोकांची कामं करतो म्हणूनच कॉलर उडवतो. तुम्ही कामाच्या बाबतीत बोला. मी असं केलं आणि तसं केलं अशी फालतूगिरी नको", असं उदयनराजे म्हणाले.

‘रयत’वरुन हल्लाबोल

"रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष हा मुख्यमंत्री असावा अशी इच्छा कर्मवीर भाऊराव पाटील यांची होती. रयत शिक्षण संस्थेत मला किंवा आवडता म्हणून शिवेंद्रलातरी घ्यायला पाहिजेत होते. रयतमध्ये सगळा भिगार भरणा. ( भिकार शब्द वापरता वापरता शब्द फिरवला ) रयत ही एक संस्था राहिली नसून ती एक खासगी इन्स्टिट्यूट झाली आहे. जर शिवेंद्रला संस्थेत घेतले असते तर त्यांच्या जशा सर्व संस्था डबऱ्यात गेल्या तशी रयतही डबऱ्यात गेली असती", असा हल्ला उदयनराजेंनी केला.

... त्यासाठी अक्कल लागते

"दुसऱ्यांवर चिखलफेक करायला अक्कल लागत नाही. लोकांची कामं करुन घ्यायला अक्कल लागते. सर्व जाहिरनामे काढून समोर बसा. मी सगळी कामं खट्ट केली. यांचे संकुचित विचार असतील तर त्यात माझा दोष नाही", अशी टीकाही उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंवर केली.

बारामतीच्या दिशेने हात करुन...

जो ब्रेन आहे ना, त्यांनी (रामराजेंनी) खासदारकीला उभं राहावं. या जिल्ह्यात त्यांनी भांडणे लावण्यापलीकडे काहीच केले नाही. मी फक्त एकालाच घाबरतो, ते म्हणजे अभिजीत बिचुकलेला. (साताऱ्याच्या राजकारणातील बहुरंगी व्यक्तीमत्व)

रामराजेंवर टीका

सातारा एमआयडीसीचे नाव खराब झाले आहे. एलएमची नवी कंपनी साताऱ्यात येत होती. पाहणी करायला आल्यावर त्यांना माझ्या काकांनी ( कै अभयसिंहराजे भोसले) पैसे मागितले आणि ती कंपनी गेली. कंपन्या यायलाच मागत नाहीत.

कंपनी स्थापन झाल्यानंतर त्या त्या कंपनीमध्ये तेथील जमीन धारकांना नोकऱ्या मिळायल्या पाहिजेत. प्रत्येकाचे वैयक्तीक इंटरेस्ट आहेत. ( रामराजेंचे नाव न घेता ) त्याला ठोकायचे असते तर त्याला मागंच ठोकले असते.

स्वयंघोषीत... त्यांचे नाव घ्यायला मला किळस वाटतो. त्यांनी त्याला (सोना इंडस्ट्रिज) केस घालायला सांगितले. बिहारचे लोक कंपनीत घेतले, मग स्थानिक काय करणार?. कामगारांचा कागदावर एक आणि दिला जाणारा पगार वेगळा. त्यात दोन हजाराचा फरक आहे.

दोन हजाराप्रमाणे दोन कोटी रुपये प्रत्येक महिन्याला खिशात जातात. कोणाच्या खिशात हे पैसे जातात?.कोणीपण यायचे आणि साताऱ्याला टपल्या मारुन जायचे?.

मी नसतो तर साताऱ्यातील अनेक ऑफिस हे बारामतीला गेले असते. माझ्या माहितीप्रमाणे त्यांना सातारा जिल्हा ठेवायचा नव्हता, तो बारामतीला जोडायचा प्लॅन होता. बारामती जिल्हा आणि कराड जिल्हा. तुम्हाला सातारा नावच दिसले नसते. मग म्हणायचे पक्षाला घरचा आहेर (शरद पवारांना टोला).

तुम्ही जर आमच्या तोंडचा घास हिसकावत असाल तर कोण गप्प बसणार?.बाकीचे गप्प बसतील मी गप्प बसणार नाही, असं उदयनराजे म्हणाले.

VIDEO: