Dnyaneshwar maharaj Palkhi Prasthan 2022 : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या सोहळ्यासाठी आळंदी नगरी सज्ज झाली आहे. आज सायंकाळी 4 वाजता पालखीचे पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान होणार आहे. कोरोनाच्या संकटामुळं गेल्या दोन वर्षापासून पायी वारी झाली नव्हती. मात्र, आता कोरोनाचा धोका कमी झाल्यानं पायी वारीला परवानगी देण्यात आली असून, शासनानं सर्व निर्बंध हटवले आहेत. कालच संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान झाले आहे. आज ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान होणार असल्यानं इंद्रायणी काठ वारकऱ्यांच्या उपस्थितीनं गजबजून गेला आहे.  




संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त राज्यातील विविध ठिकाणांहून वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. आळंदीत किमान 4 लाखांहून अधिक भाविक दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान व प्रशासनाच्या वतीने पायी वारी प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोविड काळानंतर दोन वर्षांनी आषाढी पायी वारी प्रस्थान सोहळा विना अटींमध्ये साजरा केला जाणार आहे. त्यामुळं वारकऱ्यांमध्ये वारीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


कसं आहे नियोजन

 

पालखी प्रस्थान यापूर्वी पहाटे चार वाजता घंटानाद काकड आरती व अभिषेक झाला. त्यानंतर सकाळी नऊ ते अकरा या वेळेत विना मंडपामध्ये किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात दुपारी बारा वाजता समाधीचा पाणी घालण्यात येईल. गुरु हैबतबाबा आणि संस्थानातर्फे माऊलींची आरती करण्यात येईल. त्यानंतर प्रमुख मानकऱ्यांना नारळ प्रसाद वाटप करुन या मंडपात माऊलींच्या पादुका आणल्या जातील. यावेळी संस्थानातर्फे मानकऱ्यांना मनाची पाळा गतीचा देखील वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर चार वाजता माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होईल आणि हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल झाले आहेत.

 



पालखी सोहळा आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी देहू आळंदीला छावणीचे स्वरूप

 

संत तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने होत असल्याने पालखी सोहळा आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तगडा तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय मार्फत ठिकठिकाणी मुख्य मंदिरासह गोपाळपूर नंदी घाट पहिला मुक्काम आणि महत्त्वाचे चौक या ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. यासाठी तीन पोलीस उपायुक्त आठ सहाय्यक आयुक्त 48 पोलीस निरीक्षक 128 सहाय्यक निरीक्षक उपनिरीक्षक 1हजार 732 पोलीस कर्मचारी एक एस आर पी एफ ची तुकडी असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या बरोबरच मोबाईल व्हॅन परिसरात सतत गस्तीवर असून स्मार्ट सर्वेलिअन्स व्हॅनद्वारे या सोहळ्यावर नजर ठेवण्यात येत आहे.

 


संत तुकाराम महाराज पालखीचा आजचा मुक्काम अकुर्डीत

 

काल देहू येथून प्रस्थान झालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज आकुर्डी येथे मुक्काम असणार आहे. त्यासाठी पिंपरी महानगरपालिका प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. परंपरेनुसार आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात पालखी मुक्कामी असणार आहे. त्यानंतर दोन वर्षांनी आषाढी पालखी सोहळा होणार असल्यानं आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात वारकऱ्यांचे स्वागताचे प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.


आज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. बुधवार दिनांक 22 आणि गुरुवार दिनांक 23 रोजी पुणे, शुक्रवार दिनांक 24 आणि शनिवार दिनांक 25 रोजी सासवड, रविवार दिनांक 26 रोजी जेजुरी, सोमवार दिनांक 27 रोजी वाल्हे, मंगळवार दिनांक 28 आणि बुधवार दिनांक 29 रोजी लोणंद, गुरुवार दिनांक 30 रोजी तरडगांव, शुक्रवार दिनांक 1 आणि शनिवार दिनांक 2 जुलै रोजी फलटण, रविवार दिनांक 3 रोजी बरड, सोमवार दिनांक 4 रोजी नातेपुते, मंगळवार दिनांक 5 रोजी माळशिरस, बुधवार दिनांक 6 रोजी वेळापूर, गुरुवार दिनांक 7 रोजी भंडीशेगाव, शुक्रवार दिनांक 8 रोजी वाखरी तर शनिवार दिनांक 9 रोजी श्री क्षेत्र पंढरपूर मुक्कामी सोहळा पोहोचेल. रविवार दिनांक 10 जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा होणार आहे. पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब, बाजीराव विहीर आणि इसबावी येथे उभे रिंगण तर पुरंदावडे (सदशिवनगर), पानीव पाटी, ठाकुरबुवा आणि बाजीराव विहीर येथे अश्वांचे गोल रिंगण होणार आहे.


महत्वाच्या बातम्या: