Sanjay Raut on Davos Investment: ज्या कंपन्यांची मुख्यालये मुंबईत आहेत, त्यांच्याशी करार करण्यासाठी दावोसला जाण्याची गरज नाही. त्यांनी उदाहरण दिले की, जीएसडब्ल्यू (JSW) ज्याचे मुख्यालय मुंबईच्या बीकेसीमध्ये आहे, लोढा ज्यांचे हेडक्वार्टर मुंबईत आहे आणि संगमनेरच्या पंचशील सारख्या कंपन्यांशी दावोसला जाऊन करार केले गेले आहेत, अशी खोचक टीका खासदार संजय राऊत यांनी केली. भारतातल्याच कंपन्यांशी दावोसला जाऊन करार करणे आणि त्याचे फोटो सर्वत्र झळकवणे, यामुळे जगामध्ये भारताचे हसे होते असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे असल्याचे राऊत यांनी नमूद केले. राज्यांच्या या मोठ्या शिष्टमंडळांवर पंतप्रधानांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे, कारण हे सर्व जनतेच्या कराच्या पैशावर सुरू आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
'पंचतारांकित पिकनिक' करण्याची गरज काय?
संजय राऊत म्हणाले की, सरकारने सांगितलेले आकडे सुखावणारे असले तरी ते फुगवून सांगितले जात आहेत असा त्यांचा आरोप आहे. एका दिवसात 14 लाख कोटींचे करार आणि 14 लाख रोजगार मिळणार असे सांगितले जाते, पण प्रत्यक्षात ही गुंतवणूक कुठे आहे?असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. गेल्या पाच वर्षांतील दावोस दौऱ्यांचे आकडे एकत्र केले तर ते 75 लाख कोटींवर जातात. इतकी गुंतवणूक खरंच आली असेल तर ती कुठे आहे, हे सरकारने दाखवावे. जे काम मुंबईत बसून होऊ शकते, त्यासाठी राज्याच्या तिजोरीतून पैसा खर्च करून 'पंचतारांकित पिकनिक' करण्याची गरज काय? असा सवाल त्यांनी केला असून, या दौऱ्यांवर किती खर्च होतोय हे राज्याला कळावे अशी मागणी त्यांनी केली.
तुमच्या दौऱ्यांवर किती खर्च होतोय हे दाखवा
हिंदुस्तानचे अनेक मुख्यमंत्री दावोसला जातात आणि तिथे एकमेकांना भेटतात. मात्र, या फेऱ्या मारून खरोखरच राज्यांमध्ये गुंतवणूक येते का, यावर पंतप्रधानांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असे मत राऊत यांनी व्यक्त केले जर हे आकडे खरे असतील तर त्याचे स्वागतच आहे, पण केवळ आकडेवारीचा खेळ नसावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. राऊत म्हणाले की, देशभरातल्या मुख्यमंत्र्यांची पिकनिक डावसला सुरू आहे. भारतातलेच उद्योग डावोसला जाऊन मुख्यमंत्र्यांशी करार करतात. हे फार गंमतीशीर आहे. महाराष्ट्रात करार करा ना. तुम्ही या देशातल्या कंपन्यांशी करार डावोसला जाऊन करणार असाल आणि त्याचे फोटो झळकवत असणार, सर्वत्र जगामध्ये हस होतं. तुमच्या दौऱ्यांवर किती खर्च होतोय तेही या देशाला किंवा राज्याला दाखवा. ज्या गोष्टी तुम्ही मुंबईत बसून करू शकता त्यासाठी अशा प्रकारे पंचतारांकित पिकनिक करण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
इतर महत्वाच्या बातम्या
