काळ्या पैशावर ‘स्ट्राइक’, मोदींकडून ‘जोर का धक्का धीरे से’: शिवसेना
एबीपी माझा वेब टीम | 10 Nov 2016 09:13 AM (IST)
मुंबई: पंतप्रधान मोदींनी 500 आणि 1000च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज सामनातून शिवसेनेनं मोदींच्या या निर्णयाचं स्वागत करत काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. 'पंतप्रधान मोदी यांचा हा दुसरा ‘स्ट्राइक’ म्हणजे काळ्या पैशावरील ‘हल्ला’च असला तरी त्यामुळे भ्रष्टाचारी आणि काळा पैसेवाल्यांची वळवळ कायमची थांबते का, किती काळा पैसा बाहेर येतो या प्रश्नां ची उत्तरेही भविष्यातच मिळू शकतील.' असं सामनात म्हटलं आहे. 'मागील महिन्यात पाकव्याप्त कश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचानक ‘सर्जिकल स्ट्राइक’ करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धक्का दिला होता. आता त्यांनी देशांतर्गत काळ्या पैशावर ‘स्ट्राइक’ करून आणखी एक ‘जोर का धक्का धीरे से’ दिला आहे.' असा कौतुकावर्षाव सामनातून मोदींवर करण्यात आला आहे. देशात काळापैसा आणल्यानंतर प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होऊ शकतात, असं मोदी म्हणाले होते. काळा पैसा परत आणण्यावरुन टीकाही झाली होती. मात्र देशांतर्गत काळ्या पैशाबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना मोदींनी खास शैलीत उत्तर दिल्याचंही सामनात म्हटलं आहे. एक नजर सामनाच्या अग्रलेखावर: दुसरा ‘स्ट्राइक’ * मागील महिन्यात पाकव्याप्त कश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचानक ‘सर्जिकल स्ट्राइक’ करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धक्का दिला होता. आता त्यांनी देशांतर्गत काळ्या पैशावर ‘स्ट्राइक’ करून आणखी एक ‘जोर का धक्का धीरे से’ दिला आहे. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा मंगळवार मध्यरात्रीपासून चलनातून रद्द करण्याची घोषणा मोदी यांनी दूरचित्रवाणीवरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केली आणि संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली. ती उडणे स्वाभाविकही होते, कारण हा ‘हल्ला’देखील अचानक होता. घोषणा अचानक आणि रात्री झाल्याने सामान्य नागरिकांना काही काळ अडचणींना तोंड द्यावे लागेल हे मान्य केले तरी, पंतप्रधान मोदी यांनीच म्हटल्याप्रमाणे काळा पैसा, भ्रष्टाचार आणि बनावट नोटांविरुद्ध छेडलेल्या या युद्धात सर्वसामान्यांचे जेवढे सहकार्य मिळेल तेवढ्या लवकर या युद्धात विजय मिळविणे सोपे जाईल. * काळ्या पैशाने आणि बनावट नोटांनी आपली अर्थव्यवस्था मागील काही दशकांपासून पोखरली गेली आहे. त्यातही पाकिस्तान आणि बांगलादेशातून येणार्याा बनावट नोटांचा प्रश्नग जास्तच गंभीर बनला होता. चीनदेखील आपल्या अर्थव्यवस्थेला मिळेल तेव्हा आणि जमेल तसा धक्का देण्याचा प्रयत्न करीतच असतो. चिनी हॅकर्सने केलेल्या सायबर हल्ल्यामुळे गेल्याच महिन्यात आपल्या देशातील बँकांची काही लाख डेबिट कार्डस् रद्द करावी लागली होती. शिवाय मागील काही दशकांत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांचा वापर सुमारे ४५-५० टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला होता. काळ्या व्यवहारांमध्येही उच्च मूल्यांच्या नोटांचाच गैरवापर केला जातो. दहशतवादी कारवायांसाठी होणारा निधीपुरवठा असो किंवा बनावट नोटांची ‘घुसखोरी’, ५०० आणि १०००च्या नोटा हे ‘सॉफ्ट टार्गेट’ असते. * या घुसखोरीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न याआधी झाले नाहीत असे नाही; पण त्यातून काय निष्पन्न झाले, अशी विचारणा यापूर्वीही झाली आणि आजही होत आहे. पुन्हा बनावट नोटांमुळे देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आली असे जर सरकारचे म्हणणे असेल तर मग या धोक्याचे मूळ आजपर्यंत उखडून का फेकले गेले नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. धोक्यात आलेली अर्थव्यवस्था ठीक करणे हे सरकारचे कर्तव्य आहेच, पण या व्यवस्थेला पोखरणारी बनावट नोटांची वाळवी वेळीच नष्ट करणे हीदेखील सरकारचीच जबाबदारी ठरते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात देशाबाहेर गेलेला काळा पैसा परत आणण्याचे आश्वाबसन मोदी यांनी दिले होते. एवढेच नव्हे तर हा पैसा हिंदुस्थानात आला तर प्रत्येक देशवासीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होऊ शकतात असेही ते म्हणाले होते. * देशाबाहेरील काळा पैसा परत आणण्याचे सरकारचे प्रयत्न किती यशस्वी झाले त्यावरून मधल्या काळात टीकाही झाली आणि देशांतर्गत काळ्या पैशाचे काय, असा प्रश्नयही उपस्थित केला गेला. या प्रश्नाहला पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा तडकाफडकी बाद करून त्यांच्या शैलीत उत्तर दिले. आता यातून सरकारला जे साधायचे आहे ते किती आणि कधी साध्य होते याचे उत्तर येणार्याा काळातच मिळू शकेल. केंद्र सरकारचा हा निर्णय अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करणारा आहे हे खरेच, पण पाकव्याप्त कश्मीरमध्ये करण्यात आलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’बद्दलही पाकिस्तानवर जरब बसविणारा निर्णय असेच सांगितले गेले होते. ते चुकीचे नाही. * सीमेपलीकडून होणारा गोळीबार, शस्त्रसंधीचे उल्लंघन तेव्हापासून आजपर्यंत रोजच सुरू आहे. पाकड्यांची वळवळ थांबलेली नाही. तेव्हा पंतप्रधान मोदी यांचा हा दुसरा ‘स्ट्राइक’ म्हणजे काळ्या पैशावरील ‘हल्ला’च असला तरी त्यामुळे भ्रष्टाचारी आणि काळा पैसेवाल्यांची वळवळ कायमची थांबते का, किती काळा पैसा बाहेर येतो या प्रश्नां ची उत्तरेही भविष्यातच मिळू शकतील. शेवटी भ्रष्टाचार ही एक प्रवृत्ती आहे. ती जोपर्यंत मुळापासून नष्ट होत नाही तोपर्यंत काळ्या पैशाचा रोग पूर्णपणे बरा होणार नाही. संबंधित बातम्या