Maharashtra News: एकनाथ शिंदे गटावर सामनामधून जादूटोणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षातील नेत्यांवर होत असलेले अपघात शिंदे गटानं केलेल्या जादू टोण्यामुळे घडत तर नाहीत ना? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. सुप्रिया सुळे यांच्या साडीला लागलेली आग, अजित पवार यांची लिफ्ट दुर्घटना, धनंजय मुंडे यांचा अपघात, विनायक मेटेंचा अपघाती मृत्यू... यासह अनेक घटनांबद्दल सांगतानाच कामाख्या देवीच्या दर्शनाला गेल्यानंतर जादूटोणा केल्याचं अग्रलेखात म्हटलेय. 


जादूटोणा, लिंबू-मिरची, टाचण्या, काळय़ा बाहुल्या, रेडा बळी ही काही महाराष्ट्र राज्याची ओळख असता कामा नये. तशी ती होताना दिसत आहे. मागे एकदा मुख्यमंत्री महोदय हे नागपुरातील रेशीम बागेतील संघ मुख्यालयात गेले. त्यावेळी लोकांनी त्यांची गंमत केली. ‘‘सरसंघचालकांनी सावधानता बाळगावी. मुख्यमंत्री येऊन गेलेत. संघ मुख्यालयातील कोपऱ्यात सुया, टाचण्या, लिंबू वगैरे पडले आहेत का तपासा!’’ असा सध्या चेष्टेचा विषय झाला आहे खरा. महाराष्ट्रात राजकीय विरोधकांचे जे अपघात होत आहेत यामुळे त्या अघोरी विषयांच्या चर्चांना हवा मिळाली आहे. विरोधकांच्या जीवितांचे रक्षण व्हावे यासाठी निदान उपमुख्यमंत्र्यांनी पांडुरंगास साकडे घालावे, असे सामनातील आजच्या अग्रलेखात म्हटले आहे. 


महाराष्ट्रात खोके सरकार आल्यापासून जादूटोणा, करणी, टाचण्या, लिंबू-मिरची वगैरे अंधश्रद्धांना उभारी मिळताना दिसत आहे व सध्या याच विषयांची चर्चा मंत्रालयात व इतर सरकारी कार्यालयात होत असते. मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या गटाचे चाळीस आमदार हे गुवाहाटीत कामाख्या देवीच्या मंदिरात गेले. तेथे त्यांनी जादूटोण्याचे विधी केले, रेडा बळी दिल्याचे बोलले जाते. हे बळी म्हणे मुख्यमंत्रीपदाच्या स्थैर्यासाठी दिले. पुन्हा हे लोक त्याच मंदिरात नवस फेडण्यासाठी जाऊन आले. महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे. या राज्यात जादूटोणा, सरकारी बंगल्यावरील मिरची यज्ञ वगैरे अघोरी प्रथांना स्थान नाही, पण शिंद्यांचे जादूटोणा सरकार सत्तेवर आल्यापासून राजकीय विरोधकांचे अपघात व घातपाताचे प्रमाण अचानक वाढू लागले आहे. याचा संबंध लोक सरकारपुरस्कृत जादूटोण्याशी जोडत असतील तर ते बरे नाही. पुणे शहरातील एका कार्यक्रमादरम्यान दीपप्रज्वलनाच्या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतला. उपस्थितांच्या लक्षात हा प्रकार आल्याने मोठा अनर्थ टळला. त्याचदरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे एका विचित्र लिफ्ट अपघातातून बालबाल बचावले. पवार हे तिसऱ्या मजल्यावरून चौथ्या मजल्यावर जायला निघाले. मध्येच वीज गेली आणि चौथ्या मजल्यावर पोहोचायच्या आधीच लिफ्ट धाडकन खाली कोसळली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे नागपूर अधिवेशनाच्या वेळी अपघातात जखमी झाले व त्यांचा उजवा खांदा निखळल्याने ते आजही सक्रिय नाहीत. धनंजय मुंडे यांना त्यांच्याच बीड जिल्हय़ात मोठा अपघात झाला. त्यांची कार चक्काचूर झाली. मुंडे थोडक्यात बचावले, पण त्यांच्या छातीच्या बरगडय़ा तुटल्याने ते इस्पितळात खाटेला खिळून आहेत. शिवसेनेचे संजय राऊत यांनाही नाहक तुरुंगात जावे लागले ते याच राजकीय जादूटोण्यामुळे. विनायक मेटे यांनाही अपघाती मरण आले. ते गेल्या काही काळापासून भाजपच्या विरोधात बोलू लागले होते. विरोधकांना अशा प्रकारे इस्पितळांच्या खाटांवर खिळवून ठेवणारी ही मालिका काय सांगते? असा प्रश्न सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. 


राज्याचे मुख्यमंत्री कुठे दौऱ्यावर गेले की, ते एखादा ज्योतिषी अथवा तंत्रविद्येच्या अभ्यासकाच्या खास भेटीगाठी घेतात हे काही लपून राहिलेले नाही. ही महाराष्ट्राची प्रगती नसून अधोगती आहे. कामाख्या देवीला रेडय़ाचा बळी देऊन सरकार आणले ही धारणा फुटलेल्या चाळीस आमदारांची आहे. रेडय़ाचा बळी दिला नाही हे मुख्यमंत्री व त्यांच्या लोकांनी कामाख्या देवीच्या शपथेवर सांगावे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना अपघात व घातपाताची नाट लागली. त्याचा संबंध या रेडा बळीशी आहे काय, तेसुद्धा लोकांसमोर येऊ द्या. विरोधकांच्या जीवितांचे रक्षण व्हावे यासाठी निदान उपमुख्यमंत्र्यांनी पांडुरंगास साकडे घालावे, असे आवाहन सामना अग्रलेखातून करण्यात आले आहे.