Rohit Pawar : पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. धर्माचं राजकारण ते पैशाची दलाली असे म्हणत रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपवर टीका केली आहे. त्यांनी ट्वीट करत ही टीका केलीय. जैन बोर्डिंगची जागा गिळंकृत करण्याचे बरेच प्रयत्न केले होते. परंतू सामान्य नागरिकांनी आवाज उठवताच बिल्डर्सबरोबर झालेली डील स्थगित करावी लागल्याचे रोहित पवार म्हणाले.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
राजकीय वरदहस्त असलेल्या लुटारु टोळींने जैन बोर्डिंगची जागा गिळंकृत करण्याचे बरेच प्रयत्न केले. परंतु या जागेबाबत आरोपांची राळ उठताच आणि जैन समाज व सामान्य नागरिकांनी आवाज उठवताच बिल्डर्सबरोबर झालेली डील स्थगित करावी लागली. आता जैन बोर्डिंगची जागा पुन्हा ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती मिळत असल्याचे रोहित पवार म्हणाले.
लोकांनी भाजपचा बुरखा फाडल्यामुळे माघार घ्यावी लागली
इतके दिवस सरकार एकच सांगत होतं की, यामध्ये कोणताही गैरव्यवहार नाही. मग गैरव्यवहार झाला म्हणून जागा पुन्हा ट्रस्टकडं सुपूर्द केली जात असेल तर सरकारच्या जवळच्याच कुणालातरी यामधे मोठ्या प्रमाणात नफेखोरी करायची होती हे स्पष्ट होत असल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे. निवडणुका आल्या की जाती धर्माचं राजकारण करून राजकीय पोळी भाजायची आणि पैशाचा विषय आला की सरसकट दलाली खायची. हाच भाजपचा खरा चेहरा आणि Modus operandi असल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे. या प्रकरणात देखील त्यांना हेच करायचं होतं मात्र लोकांनीच यांचा बुरखा फाडल्यामुळे माघार घ्यावी लागली. भाजपच्या याच राक्षसी वृत्ती आणि प्रवृत्ती पासून प्रत्येकाने सतर्क राहणं गरजेचं आहे. असो! अखेर जैन बोर्डिंगसाठी ज्यांनी ज्यांनी आवाज उठवला, संघर्ष केला, त्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन असे ट्वीट करत रोहित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
पुण्यातील जैन बोर्डिंग जागा विक्री प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापलं
मागील काही दिवसांपासून पुण्यातील जैन बोर्डिंग जागा विक्री प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. अशातच या ही जागा विकत घेणाऱ्या गोखले बिल्डर्सने या व्यवहारातून माघार घेतली.
महत्वाच्या बातम्या:
पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द, राजू शेट्टींची पहिली प्रतिक्रिया; मुरलीधर मोहोळांवरही स्पष्टच बोलले