जालना : आपल्या प्रचाराठी राजकीय नेते वेगवेगळ्या शक्कल लढवत असतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी तर शालेय विद्यार्थ्यांच्या वह्यांवरच आपल्या जाहिराती छापल्या आहेत. आपल्या जाहिरातीसाठी शालेय विद्यार्थ्यांच्या वह्या हे माध्यम योग्य आहे का, यावरुन टीकाही होत असली, तरी या कल्पनेची चर्चाही जालना जिल्ह्यात सुरु झाली आहे.


जालना शहरातल्या भाजपच्या कार्यलयात शालेय, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मोठ्या वह्यांची विक्री सुरु आहे. कार्यालयाबाहेर लावलेल्या बॅनरवरील माहितीनुसार या वह्या विद्यार्थ्यांना निम्म्या किंमतीत मिळणार आहेत. दानवेंनी या वह्यांची किंमत 18 रुपये प्रति नग, म्हणजेच 216 रुपये डझन अशी ठरवून दिली आहे.

विद्यार्थ्यांना वह्या वाटप करणे किंवा कमी दरात वह्या उपलब्ध करुन देणे, इथवर आपण समजून घेऊ शकतो. मात्र दानवेंनी या वह्यांचा वापर एकप्रकारे राजकीय प्रचारासाठी केला आहे. शालेय, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पालकांना आपल्या कामाचा लेखाजोखा कळावा, या उद्देशाने गेल्या चार वर्षातील कामाची यादीच त्यांनी वह्यांच्या पुठ्ठ्यांवर छापली आहे.

विशेष म्हणजे, रावसाहेब दानवेंनी अशा शे-पाचशे वह्या छापल्या नाहीत, तर तब्बल एक लाख वह्या छापण्यात आल्या आहेत.

विद्यार्थी मात्र शेरास सव्वाशेर

विद्यार्थी मात्र रावसाहेब दानवेंच्या या वह्यांच्या क्लृप्तीबाबत ‘शेरास सव्वाशेर’ निघाले आहेत. आम्ही काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यातील काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया अत्यंत इंटरेस्टिंग होत्या.

स्वस्तात वह्या मिळत आहेत, तर खरेदी करणार आणि कव्हर घालून वापरणार, असे हे विद्यार्थी सांगू लागलेत. त्यामुळे चलाख विद्यार्थ्यांनी दानवेंची शक्कल मोडीत काढली आहे.

रावसाहेब दानवेंसारख्या ज्येष्ठ नेत्याने शालेय वह्यांचा वापर आपल्या राजकीय प्रसार-प्रचारासाठी करावा, हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत विविध स्तरातून व्यक्त केले जात आहे.