मुंबई : उत्तरप्रदेशच्या भाजपच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं आहे, मग महाराष्ट्रात शेतकाऱ्यांना कर्जमाफी का नाही?, असा सवाल शिवसेना मंत्री रामदास कदम यांनी केला आहे.


विश्वासघातकी भाजपसोबत मैत्री असू नये, शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची राजीनामा देण्याची तयारी आहे. आमची औकात काय ते 23 फेब्रुवारीला दाखवून देऊ. उद्धव ठाकरेच राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय घेतील, असा घणाघात रामदास कदम यांनी केला आहे.

शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार का, यावरही त्यांनी उत्तर दिलं. सोशल मीडियावर ज्या चर्चा सुरु आहेत, त्याला आपल्या शुभेच्छा. शिवसेनेचे मंत्री खिशात राजीनामा घेऊन फिरतात, असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा या बंगल्यावर दाखल झाले आहेत. कर्जमाफीची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे केली जाऊ शकते, असं बोललं जात आहे.