Ramdas Athawale On Sharad Pawar : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरील कारवाई योग्य आहे. राहुल गांधी हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.  राहुल गांधी यांच्यावरील कारवाईमध्ये भाजपाचा संबंध नाही.  राहुल गांधींनी याआधी अनेक वेळा चुकीचे वक्तव्य केली आहेत, एकदा त्यांना माफी देखील मागावी लागली आहे, त्यामुळे राहुल गांधी यांनी आपले तोंड सांभाळून बोलले पाहिजे. तसेच मोदी यांच्यावर टीका करून काँग्रेसचा फायदा होत नाही आणि पक्ष वाढत नाही, असा टोला देखील आठवलेंनी लगावला आहे.  


शरद पवारांनी आता एनडीएसोबत यावं, मंत्री रामदास आठवलेंची ऑफर -


शरद पवारांना आता एनडीएसोबत यावे असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. नागालँडप्रमाणे देशाच्या विकासासाठी शरद पवारांनी एनडीए सोबत यावे, असे निमंत्रण देत शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध असून मोदींकडून पवारांचें अनेक वेळा कौतुक केले आहे. तसेच शरद पवारांनी कितीही विरोधी पक्षाला एकत्र करून आघाडीच्या बैठका घेतल्या. तरी 2024 मध्ये पुन्हा एनडीएचे सत्ता येणार आहे, असे ही मंत्री आठवले यांनी स्पष्ट केले.


राज ठाकरे हे गर्दी जमवण्यात एक्स्पर्ट -


मनसे नेते राज ठाकरे यांचावरही केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली आहे. राज ठाकरे हे गर्दी जमवण्यात एक्स्पर्ट आहेत. मुंबईचा मुख्यमंत्री शिंदे आणि उप मुख्यमंत्री फडणवीस विकास करत असताना त्याला डान्सबार म्हणणं चुकीचं आहे. तसेच राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा वाढवू नये, भोंगे काढण्या पेक्षा मंदिरावर भोंगे कसे लावता येतील ते बघावे. भोंग्याना विरोध करू नये आणि राज ठाकरे यांनी चांगले काम करून आपला पक्ष वाढवावा, असा टोला आठवले यांनी लगावला आहे. 


आठवलेची शिर्डी लोकसभा मतदारसंघातून  निवडणूक लढवण्याची इच्छा -


लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला दोन जागा मिळाव्यात, अशी आपली मागणी असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघातून  निवडणूक लढवण्याची आपली इच्छा असून मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस त्याचबरोबर अमित शहा आणि जे.पी.नड्डा यांची भेट घेऊन त्याबाबत चर्चा देखील करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहे.