परभणी : राज्यात सध्या अत्यंत गलिच्छ राजकारण सुरू असून नेत्यांनी स्वतःबद्दल लोकांमध्ये असलेल्या प्रतिक्रिया ऐकायच्या असतील तर त्यांनी वेश बदलून लोकांमध्ये फिरावं असं माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) म्हणाले. शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narwekar) जो निर्णय दिला आहे तो अत्यंत चुकीचा असून संविधानाच्या मार्गाने नाही तर तो राजकीय निर्णय असल्याची टीकाही त्यांनी केली. परभणीमध्ये राजू शेट्टी यांनी हे वक्तव्य केलं आहे. 


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रतेसंबंधी दिलेल्या निर्णयावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली. राहुल नार्वेकरांनी जो निर्णय दिला तो संविधानाला धरून नाही तर तो राजकीय मार्गाने दिला असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली. भाजपने मोठ्या नेत्यांना ऑफर देणे, पक्ष फोडायला लावणे बंद करून आपल्या कार्यकर्त्यांना उभं कर करावं असा राजू शेट्टी यांनी लगावला. 


मनोज जरांगे मुंबईला जाणे परवडणारे नाही


मराठा आरक्षणाच्या प्रश्नी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी घेतला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी म्हणाले की, मनोज जरांगे आणि एवढा मोठा मराठा समाज हा मुंबईकडे जाणार हे सरकारला आणि मुंबईलाही परवडणार नाही. त्यामुळे सरकारने 20 जानेवारीच्या आधीच तो निर्णय घ्यावा. महत्त्वाचे म्हणजे 52 टक्क्यांची मर्यादाच या सरकारने काढून टाकावी.


ऊस दरासाठी परभणीत 2 तास रास्ता रोको 


उसाला 2700 रुपये भाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि किसान सभेच्या वतीने परभणी गंगाखेड महामार्गावरील सिंगणापूर फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करणयात आले. या रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानीचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केले. जवळपास दोन तास हा रास्ता रोको चालला. यामुळे परभणी गंगाखेड महामार्ग तसेच पूर्णा-परभणी महामार्गाची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतर राजू शेट्टी आणि कारखानदार यांच्यात बैठक झाली. यात 2500 ऐवजी 2700 रुपये भाव देण्याचे मान्य करण्यात आल्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आले.


दरम्यान, राजू शेट्टींचा साथीदार आणि स्वाभिमानीचे बुलढाण्याचे नेते रविकांत तुपकर यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभा निवडणूक लढवणार आणि जिंकणार असं स्पष्ट केलं आहे.


ही बातमी वाचा: